… म्हणून अर्थमंत्री अजित पवार यांनी पुन्हा पाठविले PM नरेंद्र मोदी यांना पत्र

पोलिसनामा ऑनलाईन टीम – राज्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस अधिकच घट्ट होत चालला आहे. त्यापार्श्वभूमीवर सर्व आर्थिक व्यवहार ठप्प असल्याने राज्याची तिजोरी खाली झाली आहे. त्यामुळे केंद्राने अर्थसहाय्य करावे या मागणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहून मदतीची मागणी केली आहे.

राज्याच्या उत्पन्नातील अपेक्षित तूट लक्षात घेऊन पुढील पाच महिन्यांसाठी महाराष्ट्राला दरमहा 10 हजार कोटींचे अनुदान दिले जावे. आर्थिक आव्हानांचा सामना करण्यासाठी वित्तीय तुटीची मर्यादा पाच टक्क्यांपर्यंत वाढवण्यात येण्याची मागणी अर्थमंत्री अजित पवार यांनी केल्या आहेत. त्यांनी राज्याच्या औद्योगिक, व्यापारी, आर्थिक क्षमतेबद्दल पंतप्रधानांना विश्वास दिला आहे. कोरोना संकटावर मात करण्याची महाराष्ट्राची ताकद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारने 24 मार्चपासून 3 मेपर्यंत जाहीर झालेल्या टाळेबंदीमुळे राज्यांची अर्थव्यवस्था ठप्प आहे.

मार्च महिन्यात महाराष्ट्राच्या जीएसटी उत्पन्नात 27 हजार कोटींची घट आहे. टाळेबंदी सुरुच असल्याने पुढचे काही महिने अर्थव्यवस्था खाली जाण्याची भीती आहे. त्यामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी ठरलेल्या सूत्रांप्रमाणे देय अनुदान तात्काळ द्यावे, अशी मागणी पवार यांनी केली आहे. केंद्राकडून महाराष्ट्राला देय निधी मिळत नसल्याने राज्य सरकारला अवघड झाले आहे.

ही वस्तूस्थिती केंद्र सरकारने विचारात घ्यावी व सहकार्य करावे, असेही उपमुख्यमंत्र्यांनी पत्रात नमूद केले आहे. महाराष्ट्राने नेहमीच आर्थिक नियम, कायदे आणि वित्तीय शिस्तीचे पालन केले आहे. यापुढेही करणार आहे. राज्याची आर्थिक क्षमता, राज्य उत्पन्नाची सद्यस्थिती आणि राज्यासमोरील आव्हाने लक्षात घेऊन एफआरबीएम कायद्यान्वये राज्यावरील आर्थिक तूटीची मर्यादा 5 टक्यांपर्यंत वाढवण्यात यावी.