मुख्यमंत्री फडणवीसांच्या सुप्रीम कोर्टातील खटल्याबाबत शरद पवार म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शपथपत्र सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रलंबित असलेल्या दोन गुन्हेगारी प्रकरणांची माहिती दिली नव्हती. या प्रकरणात अ‍ॅड. सतीश उके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

निवडणूक शपथपत्रात दोन गुन्ह्याची माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरूद्ध खटला चालवण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली. या वरून राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. “राज्याचे मुख्यमंत्री स्वतःवरील गुन्हे लपवण्याचे काम करत आहेत. ज्यांच्यावर कोणताच गुन्हा नाही त्यांच्यावर गुन्हा दाखल होतोय,” अशी टीका शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे.

काही दिवसांपूर्वी कोणताही संबंध नसताना शरद पवारांचे नाव शिखर बँक घोटाळ्यात ईडीकडून गोवण्यात आले होते. त्यानंतर अनेक पक्षांकडून शरद पवारांची पाठराखण करण्यात आली होती. सत्तेतील शिवसेनेने देखील पवारांची बाजू घेतली होती. तसेच याच कारणावरून अजित पवारांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा धिला होता. त्यावरून आता शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना चांगलेच धारेवर धरले आहे.

पवार म्हणाले, “निवडणुकीचा अर्ज भरताना आपल्यावरील गुन्ह्यांची माहिती सादर करणे गरजेचे असते. मात्र राज्याचे मुख्यमंत्रीच स्वतःवरील गुन्हे लपवण्याचे काम करत आहेत. ज्यांच्यावर कोणताच गुन्हा नाही त्यांच्यावर गुन्हा दाखल होतोय, पण गुन्हेगारांना कसलीच फिकीर नाही. इथे सत्तेचा गैरवापर होतोय,” असा आरोप शरद पवार यांनी केला आहे. तसेच “राज्यात गुन्हेगारीमध्ये वाढ झाली आहे. यातील सर्वाधिक गुन्हे हे स्त्रियांवरील अत्याचारांचे आहेत. त्यामुळे ज्यांना आपल्या आई-बहिणींच्या अब्रूची काळजी नाही, त्यांच्या हाती सत्ता देणं चुकीचं ठरेल,” असं पवार म्हणाले.

अ‍ॅड. सतीश उके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदारकी रद्द केली जावी अशी मागणी त्यांनी केली होती.

Visit : Policenama.com