साखरपुड्याच्या समारंभात गोळीबार; पाच वर्षाच्या मुलाच्या मृत्यू

अलाहाबाद : वृत्तसंस्था
अलाहाबादमध्ये एका साखरपुड्याच्या कार्यक्रमात अचानक केलेल्या गोळीबारात एका पाच वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. ही घटना अलाहाबादमधील रंगपुरा या गावात घडली असून, ज्यावेळी नवऱ्या मुलीने नवरदेवाच्या गळ्यात वरमाला घातली त्यावेळी अचानक गोळीबार करण्यात आला. या प्रकरणी पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचा पोलीस सध्या कसून शोध घेत आहेत.

हा गोळीबार नेमका चुकून झाला की, जाणूनबुजून करण्यात आला याबाबातची अधिकृत माहिती समजू शकलेली नाही. मात्र,मुलींच्या कुटुंबीयांनी साखरपुड्याचा सोहळा पूर्ण झाल्याच्या आनंदात गोळीबार केल्याचा दावा केला आहे. पण यावेळी निशाणा चुकल्याने ही दुर्घटना घडली.

तर वरपक्षाने असा आरोप केला आहे की, नवरदेवावर निशाणा साधून हा गोळीबार करण्यात आला होता. तसेच एकदा नाही तर यावेळी तीन राऊंड फायर केले आहेत. दरम्यान, गोळीबार करणारी व्यक्ती फरार झाली असून, दुसरीकडे अशीही चर्चा सुरु आहे की, गोळीबार करणारी व्यक्ती ही या लग्नामुळे नाराज होता. त्याला कोणत्याही परिस्थितीत हे लग्न मोडून नवऱ्या मुलीशी लग्न करायचे होते. त्यामुळे त्याने हा गोळीबार केला आहे.