तुकाराम मुंढे आमचे वैयक्तिक शत्रू नव्हते, नागपूरच्या महापौरांची पहिली प्रतिक्रिया

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन –   नागपूर माहापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीबाबत अनेक संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र, त्यांच्या बदलीची मागणी आम्ही कधीच केली नव्हती. त्यांच्यासोबत मतभेद झाले, मात्र ते कामाच्या बाबतीत होते. वैयक्तिक मतभेद कधीच नव्हते. आयुक्तांनी पदाधिकाऱ्यांशी समन्वय ठेवून कार्य करावे, हीच आमची अपेक्षा होती, अशी प्रतिक्रिया नागपूर महापालिकेचे महापौर संदीप जोशी यांनी दिली आहे. तसेच तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर त्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

महापौर संदीप जोशी यांनी पुढे म्हटले की, जनप्रतिनिधी याच शहरात लहानांचे मोठे झाले. त्यांना या शहराच्या कानाकोपऱ्याची माहिती आहे. नागरिकांच्या समस्या माहिती आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रशासकीय अधिकारी म्हणून आयुक्तांनी प्रत्येक जनप्रतिनिधींशी समन्वय ठेवायलाच हवा. आम्हाला घेऊन चालावे, अशी आमची अपेक्षा होती. तुकाराम मुंढे हे आमचे वैयक्तिक शत्रू नव्हते. त्यामुळे त्यांची बदली झाली म्हणून आम्हाला कोणत्याही प्रकारचा आनंद होत नाही.

ते लोकांना घेऊन चालले असते तर आम्हाला अधिक आनंद झाला असता. ही बदली शासनाने केली आहे. आता शासन आमचं नाही. 2019 पूर्वीची पाच वर्षे वगळता शासन काँग्रेसचं होतं. त्याही काळात अनेक आयुक्त आलेत. मात्र, प्रत्येकासोबत आमचे मित्रत्वाचे संबंध होते. यापुढे देखील जे आयुक्त येतील त्यांनी देखील पदाधिकाऱ्यांशी समन्वय ठेवावा, आम्ही ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे राहू, असे महापौर संदीप जोशी यांनी म्हटले आहे.