सरपंचासह पाचजण वर्षासाठी हद्दपार, सांगली जिल्ह्यात खळबळ

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्यातील जत तालुक्यातील कोणत्याव बोबलाद येथील सरपंचासह पाच जणांना सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातून 1 वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी गुरुवारी याबाबतचे आदेश दिले. सरपंच नंदकुमार भिवा करे (वय 29) याच्यासह 5 जणांचा यात समावेश आहे. खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी असे गंभीर गुन्हे या टोळीवर दाखल आहेत.

सरपंच नंदकुमार करे, शिवाजी भिवा करे (वय 30), आप्पा शिवाजी लोखंडे (वय 44), गोरख लिंबाजी लोखंडे (वय 39), बबन रामा करे (वय 39) अशी हद्दपार केलेल्यांची नावे आहेत. सरपंच करे याच्यासह टोळीच्या गुन्हेगारी कारवाया वाढल्या होत्या. त्यांच्यावर वेळोवेळी कारवाई करण्यात आली होती.

कारागृहातुन बाहेर आल्यावरही या टोळीकडून गुन्हेगारी कारवाया केल्या जात होत्या. या टोळीवर खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, सशस्त्र दरोडा, बेकायदा घातक हत्यारे बाळगणे, गर्दी मारामारी असे अनेक गुन्हे या टोळीवर दाखल आहेत.

या टोळीला 1 वर्षासाठी सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश अधीक्षक शर्मा यांनी दिले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले, एलसीबी चे निरीक्षक श्रीकांत पिंगळे, विशाल भिसे यांनी कारवाईत भाग घेतला.