धक्कादायक ! हिंगणघाटनंतर नवी मुंबईत महिलेला जाळण्याचा प्रयत्न, गळफास देऊन केला खून

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – हिंगणघाट आणि औरंगाबाद येथील घटना ताज्या असतानाच नवी मुंबईत एका महिलेला जाळण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्यात आणि देशात महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत वाढ होत असून हिंगणघाट प्रकरणामुळे राज्याला आणि देशाला हादरवून सोडेले आहे. यातच नवी मुंबईतील प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. नवी मुंबईमध्ये एका महिलेला पेटवून देण्याचा प्रयत्न केल्यानंतर पाच आरोपींनी तिला गळफास लावला. त्यामध्ये या महिलेचा मृत्यू झाला.

या खळबळजन प्रकारामुळे नवी मुंबई हादरून गेली असून या प्रकरणी पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पनवेल पोलिसांकडून पाच आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. ही घटना नवी मुंबईतील पनवेलमधील दुंद्रे गावात घडली. चोरीच्या आरोपावरून या महिलेला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. आरोपींनी महिलेला जाळण्याचा प्रयत्न करून तिला गळफास देऊन तिचा खून केला.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेवर शेजारच्यांनी काही दिवसांपूर्वी मंगळसूत्र चोरीचा आरोप केला होता. यावरून मोठा वाद झाला होता. त्यानंतर हे प्रकरण मिटवण्यात आले होते. यानंतर आज सकाळी शेजाऱच्यांनी महिलेच्या घरात घुसून तिला पेटवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिला गळफास लावून लटकवण्यात आले. यामध्ये महिलेचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पनवेल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पनवेल पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरु केला आहे.