पुण्यात पुन्हा एकदा जळीतकांड : कसबा पेठेत ५ गाड्या जाळल्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यात पुन्हा एकदा वाहने जाळण्याचा प्रकार घडला आहे. यापूर्वी देखील अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे पुण्यात गाड्यांची तोडफोड तसेच गाड्या जळणाऱ्यांची दहशत निर्माण झाली आहे. आता पुण्यातील मध्यवस्तीत असलेल्या कसबा  पेठेत रस्त्यावर उभ्या असलेल्या पाच दुचाकी  जाळण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

पुण्यातील मध्यवर्ती भागात असलेल्या कसबा पेठेतील माळवदकर गल्लीतील एका रस्त्यावर उभ्या असलेल्या पाच दुचाकी मंगळवारी पहाटे अज्ञाताकडून जाळण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे पोलीस चौकीपासून काही अंतरावर असलेल्या या दुचाकी जाळल्याने पुणेकरांच्या सुरक्षिततेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कसबा पेठेतील माळवदकर गल्लीतील एका रस्त्यावर पाच दुचाकी उभ्या करण्यात आल्या होत्या. या दुचाकींना मंगळवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने आग लावली. यामध्ये पाचही दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. या घटनेनंतर कसबा पेठेतील अग्निशमन दलाच्या जवानांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. काही मिनिटांतच जवानांनी ही आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत पाचही वाहनांचे मोठे नुकसान झाले होते.

जुन २०१५ सनसिटी भागात तब्बल ८० गाड्यांची जाळपोळ
पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड रोडवरील सनसिटी भागात तब्बल ८० गाड्यांची जाळपोळ केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज मिळालं होतं  ज्यात आग लावताना एक जण दिसला होता.

निर्मल टाऊनशिप, सुर्यनगरी सोसायटी, सनसिटी, स्वामीनारायण सोसायटी, अक्षय ग्लोरी, अवधूत सोसायटी अशा वेगवेगळ्या सोसायटीमधल्या पार्किंग लॉटमध्ये असलेल्या किमान ८० ते ९० गाड्या पहाटे सुमारे ३:५७  ते ४:२६  या वेळेत पेटवण्यात आल्या होत्या. एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहनांची जाळपोळ झाल्याने खळबळ माजली होती.

जून २०१५ : औंध परिसरात पार्किंगमध्ये लावलेल्या ५ गाड्या जळाल्या.
जून २०१५ : सिंहगड परिसराकील एका सोसायटीत ८० चारचाकी व दुचाक्या जाळल्या. याप्रकरणी एका मनोरूग्णाला ताब्यात घेतले होते.
जुलै २०१५ : चाकण परिसरात घराबाहेर लावलेल्या दुचारी, कार व टॅक्टरसह ७ वाहने पेटवून दिली होती.
ऑक्टोबर २०१५ : हडपसर भागात ६ गाड्या जाळल्या गेल्या.

मार्च २०१६ ,कात्रजमधील गणेश पार्क सोसायटी ३ कार, १५ दुचाकी पेटवल्या !
एकाच आठवड्यात पुण्यात तीन वेगवेगळ्या भागात अनेक कार व दुचाक्या पेटवून देण्याचा प्रकार उघडकीस आला होता.  कात्रजमधील गणेश पार्क सोसायटीत ३  कार तर १५ दुचाक्या पेटवून दिल्या होत्या  तर २३ मार्च रोजी धायरीतील डीएसके सोसायटीतील एका बिल्डिंगमध्ये १५ दुचाक्या पेटवून दिल्या होत्या, तर २५ मार्च रोजी एरंडवणेतील राजमयुर सोसायटीतील काही दुचाक्या पेटवून दिल्या होत्या. त्यामुळे एकाच आठवड्याभरात तीनदा घटना घडल्या असून सुमारे ३० हून गाड्यांचे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर पुणेकर धास्तावले आहेत.

जुलै २०१७ पर्वती भागात ३० गाड्या जाळल्या
पर्वती पायथ्याजवळच्या जनता वसाहत गल्ली क्रमांक ३८ जवळ असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या सुलभ शौचालायासमोर असलेल्या मैदानात परिसरातील रहिवाश्यांनी लावलेल्या २७ मोटारसायकल, १ सायकल आणि १ तीन चाकी टेंपो अशा २९ वाहनांना ९ जुलै रोजी  पहाटे पावणे दोन वाजता आग लागल्याची घटना घडली होती.

मार्च २०१८
धायरीमधील एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये एका बाईकवरून दोन जण रात्री २च्या सुमारास शिरले. सोसायटीत शुकशुकाट असल्याचे त्यांनी बघितले, ऑडी  पेटवून  लगेच दुचाकीवरून पळ काढला होता.