इंडोनेशिया मध्ये पूराचा हाहाकार, ७९ जणांचा मृत्यू 

पापुआ : वृत्तसंस्था – इंडोनेशिया मधील पापुआ भागात महापूर आला आहे. अचानक आलेल्या या महापुरात ७९ जणांचा मृत्यू झाला आहे. पूर आणि भूस्खलनामुळे ११६ जण जखमी झाले असून त्यातही ४१ जनांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती तेथील आपत्कालीन विभागाच्या आधिकऱ्यानी सोमवारी जयपूरा जिल्ह्यातील पूरग्रस्त गावांना भेटी दिल्यानंतर दिली. यावेळी पुरामुळे अनेक जिल्ह्यांना फटका बसला असून मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, शनिवारी जयपूरा जिल्ह्यातील अनेक गावांना पूराचा फटका बसला आहे. शनिवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून जयपुरा भागात पावसाला सुरुवात झाली होती. या परिसारतील घरे, रस्ते, पूल आणि इतर ठिकाणांना पूरामुळे मोठे नुकसान झाले आहे.

इंडोनेशियामधील बचाव कार्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, भूस्खलनामुळे एकाच्या घराचा भाग कोसळला, या मलब्याखाली अडकलेल्या एका चिमुकल्याला वाचविण्यात आम्हाला यश आले. पाच महिन्याच्या या चिमुकल्याला त्याच्या वडिलांकडे सुखरुप देण्यात आलं. इंडोनेशिया येथे यापूर्वीही अनेक नैसर्गिक संकटे आली होती. या संकटामुळे येथे अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच जीवितहानी मोठ्या प्रमाणात होऊ नये यासाठी प्रशासन काळजी घेत आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रवक्ते पुर्वी नुग्रोहो यांनी सांगितले की, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी पुरामध्ये बेपत्ता असलेल्या लोकांचा शोध घेण्याचं काम करत आहे. आत्तापर्यंत ४ हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं आहे. पूरामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याच्या घटना घडल्या आहेत. सध्या पूरातील पाण्याची पातळी कमी होत असली तरी नागरिकांच्या सुरक्षेचं मोठं आव्हान आमच्या समोर आहे. पूरामुळे अनेक भागात घरं पडली आहेत, झाडं कोसळली आहेत, रस्त्यावर चिखल झालेला आहे. त्यामुळे नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होत आहे.