स्थलांतरित कामगारांसाठी मोदी सरकारची नवीन ‘योजना’, 116 जिल्ह्यांत मिळणार ‘रोजगार’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –    कोरोना संकटाच्या काळात मोठ्या संख्येने प्रवासी कामगार घरी परत आले आहेत. अशा परिस्थितीत कामगारांसमोर रोजगाराचे मोठे संकट निर्माण झाले आहे. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार विशेष मोहीम सुरू करणार आहे. या योजनेचे नाव गरीब कल्याण रोजगार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 जून रोजी या योजनेची सुरुवात करणार आहेत. त्याचबरोबर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गुरुवारी माध्यमांना या योजनेची माहिती दिली.

या योजनेंतर्गत देशातील विविध भागांमधून आपापल्या गावी स्थलांतर करणार्‍या प्रवासी कामगारांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात येईल. यासह देशातील सहा राज्यांतील 116 जिल्ह्यांमध्ये ही मोहीम सुरू केली जाईल. 20 जूनपासून मोहीम सुरू करण्याच्या निमित्ताने या राज्यांचे मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्रालयातील मंत्रीदेखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जोडले जातील.

worker

कामगारांना देण्यात येतील 25 प्रकारची कामे

50 हजार कोटी रुपये खर्चून सुरू केलेल्या या योजनेंतर्गत कामगारांना 25 प्रकारची कामे देण्यात येणार आहेत. या योजनेचा लाभ ज्या राज्यांना होणार आहे त्यात बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड आणि ओडिशाचा समावेश आहे. 25 हजार प्रवासी कामगारांना या योजनेचा फायदा होणार असल्याचा दावा केला जात आहे. मजुरांची कौशल्य मॅपिंग केल्याचा सरकारचा दावा आहे.

तत्पूर्वी, गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासगी क्षेत्रासाठी 41 कोळसा ब्लॉक्स च्या लिलाव प्रक्रियेची सुरुवात केली. या दरम्यान पीएम मोदी म्हणाले की, आज आम्ही केवळ व्यावसायिक कोळसा खाणीसाठी लिलाव प्रक्रियाच सुरू करत नाही आहोत, तर कोळसा क्षेत्राला अनेक दशकांच्या लॉकडाऊनमधून बाहेर काढत आहोत.