राज्यातील सर्व गरजूंना लस मिळेल, काही अडचण आल्यास राज्य सरकार सक्षम : आरोग्यमंत्री राजेश टोपे

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – आजपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली. आज दिली जाणारी लस (Vaccines)  ही मोफत दिली जात असून, लसीकरणातील शेवटच्या लाभार्थ्यांना मोफत लस (Vaccines) मिळावी यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करीत आहोत. दारिद्रय रेषेखालील गरजूंना मोफत लस (Vaccines) मिळावी असा मानस असून यात काही अडचण आली तर राज्य सरकार यासाठी सक्षम असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

जालना जिल्ह्यातील रुग्णालयात कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यास शनिवारी सुरुवात करण्यात आली. त्यावेळी आयोजित लसीकरण शिबिरात निवासी वैद्यकीय अधिकारी पद्मजा सराफ यांना कोरोनाची लस देण्यात आली. मार्च २०२० पासून आतापर्यंत कोरोनामुळे सर्वसामान्यांचे हाल झाले. या काळात आरोग्य विभागासह इतर विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी केलेल्या कामामुळे कोरोना नियंत्रणात राहिला. राज्यात आज कोरोना लसीकरणास सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात स्वच्छता कर्मचारी, जेष्ठ नागरिकांना लस दिली जाणार आहे.

पहिल्या टप्प्यामध्ये राज्यासाठी १७.५० लाख डोस आवश्यक आहेत. आजवर ९.८० लाख डोस प्राप्त झाले आहेत. उर्वरित डोस लवकर उपलब्ध होतील, तसेच दारिद्रय रेषेखालील सर्वाना मोफत लस मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तर राज्यातील सर्व गरजूंना लस मिळेल, कोणालाही राज्य सरकार वाऱ्यावर सोडणार नाही अशी ग्वाहीसुद्धा टोपे यांनी यावेळी दिली. यावेळी जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे, पोलीस अधीक्षक विनायक देशमुख,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, जिल्हा शल्य चिकित्सक अर्चना भोसले, माजी मंत्री अर्जुन खोतकर, जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर यांच्या सह अनेक अधिकारी उपस्थित होते.