‘आरे’ कॉलनीतील आगीमागे संशयाचा धूर, रामदास कदम यांची चौकशीची मागणी 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गोरेगावमधील ‘आरे’ कॉलनीमधल्या जंगलाला लागलेली आग आता नियंत्रणात आली असली तरी  या आगीबाबत संशयाचा धूर निर्माण झाला आहे. या आगीबाबत खुद्द राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी संशय व्यक्त केला आहे. या आगीची तात्काळ चौकशी करण्यात यावी, अशी मागणी देखील रामदास कदम यांनी केली आहे. तसेच यासंदर्भात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी देखील चर्चा केल्याचे रामदास कदम यांनी सांगितले आहे.

आगीमागे मोठे षडयंत्र
या आगीमागे मोठं षडयंत्र असल्याचा आरोप वनशक्ती या संस्थेने केला आहे. आरे कॉलनीतील जमीन मिळवण्यासाठी जाणूनबुजून ही आग लावल्याचा आरोप होत आहे. दरम्यान या आगीची उच्चस्तरीय चौकशी करण्याचा आदेश दिल्याचं सहाय्यक मनपा आयुक्त संजोग कबरे यांनी सांगितलं. आरोपांमध्ये तथ्य असेल तर दोषींविरोधात कारवाई केली जाईल, असं शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी सांगितलं.

तब्बल सहा तासांनी आग आटोक्यात
आरे कॉलनीतील जंगलाला सोमवारी संध्याकाळी साडेसहा वाजता लागलेली भीषण आग तब्बल सहा तासांनी आटोक्यात आली आहे. अग्निशनम दलाच्या जवळपास १०० जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत रात्री साडेबाराच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवलं. डोंगराळ भाग असल्याने अग्निशमन दलाच्या गाड्या तिथे पोहोचू शकल्या नाहीत. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांनी पायी जाऊन आग विझवली.

आरे कॉलनीतील जंगलाला भीषण आग
गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनीतील जंगलाला लागलेल्या भीषण आगीला तब्बल सहा तासांनी आग्निशामक च्या १०० जवानांनी रात्री साडेबारा वाजता नियंत्रणात आणले. आरे कॉलनीतील इन्फिनिटी आय टी पार्कच्या जवळच्या जंगलात सोमवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास ही भीषण आग लागली ही आग ३ ते ४ किलोमीटर परिसरात पसरली होती. या आगीची तीव्रता पाहता जंगलात राहणाऱ्या आदिवासी आणि गाई-गुरांना दुसऱ्या ठिकाणी हालवण्याच्या सूचनाही अग्निशामक दलामार्फत देण्यात आल्या.

डोंगराळ भागात आग लागल्याने अग्नीशामक दलाच्या गाड्या तिथे पोहचू शकत नव्हत्या त्यामुळे जवानांनी पायी जाऊन आग वीजवली. आरे कॉलनीतल्या डोंगरावरील जंगलाला लागलेली आग ही इतकी भीषण होती की ती शहराकडे पसरते की काय अशी भीती स्थानिकांना वाटत होती. आग लागल्याची छायाचित्रे स्थानिकांनी समाज माध्यमांवर अपलोड केली.

येथील डोंगर परिसरात सातत्याने आगीच्या घटना घडत आहेत. काही महिन्यांपूर्वी येथे आग लागल्याची घटना घडली होती. तेव्हा स्थानिकांनी अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविले होते. मात्र या आगी लागत नसून त्या लावल्या जात असल्याचा संशय स्थानिकांना आहे. त्यामुळेच याबाबत स्थानिक प्रशासनाने सज्ज राहावे, असेही प्राणिमित्र संघटना आणि पर्यावरणवादी संघटनांचे म्हणणे आहे.