राणेंच्या आत्मचरित्रात राज ठाकरेंबद्दल २ खळबळजनक ‘गौप्यस्फोट’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या ‘No Hold Barred : My Years in Politics’ या आत्मचरित्रातून वादळी खुलासे करण्यास सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आत्मचरित्रातून माहिती बाहेर आल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविषयी नारायण राणे यांनी गौप्यस्फोट केले आहेत. या आत्मचरित्रात त्यांनी खळबळजन दोन गौप्यस्फोट केले आहेत. राज ठाकरेंनी शिवसेना सोडायच्या आधी २००५ मध्येच नारायण राणे यांनी शिवसेना सोडली होती. ज्यावेळी राज ठाकरे यांनी पक्ष सोडला तेव्हा त्यांनी आपल्याशी संपर्क केला होता, असा देखील आरोप यात करण्यात आला आहे.

पहिला गौप्यस्फोट

शिवसेनेतील अंतर्गत राजकारणाला कंटाळून राज ठाकरे यांनी २००६ साली शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला. महाराष्ट्रभर दौरा करुन, राज ठाकरे यांनी ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ नावाचा पक्ष स्थापन केला. शिवसेना सोडल्यानंतर एकत्र येऊन नवीन पक्ष स्थापन करण्याचे निमंत्रण राज ठाकरेंनी आपल्याला दिलं होतं, असा खळबळजनक गौप्यस्फोट नारायण राणे यांनी आत्मचरित्रात केला आहे. मात्र, राज ठाकरेंचं निमंत्रण नारायण राणेंनी नाकारलं. “ठाकरेंची कामाची पद्धत माहित असल्यानं, सोबत काम करणार नाही.” असे नारायण राणेंनी राज ठाकरेंना कळवलं.

दुसरा गौप्यस्फोट

राज ठाकरे यांनी २००५ साली शिवसेना सोडली त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रभर दौरे करून आपल्याला कसा प्रतिसाद मिळेल याचा अंदाज घेतला असल्याचे नारायण राणे यांनी आपल्या पुस्तकात म्हटले आहे. त्यावेळी शिवसेनेतील बाळा नांदगावकर, शिशीर शिंदे, प्रवीण दरेकर यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते राज ठाकरेंसोबत आले. त्याचबरोबर राज ठाकरेंसोबत शिवसेनेतले जवळपास ३८ आमदार होते. राज ठाकरेंनी शिवसेना सोडली, त्यावेळी हे ३८ आमदारही पक्ष सोडणार होते. मात्र, प्रत्यक्षात १३ आमदारांनी सोडलं, असे देखील नारायण राणेंनी आत्मचरित्रात म्हटले आहे.

दरम्यान, आता नारायण राणे आणि राज ठाकरे दोघांचेही स्वतंत्र पक्ष असून राज ठाकरे यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.