अब्दुल सत्तार-रावसाहेब दानवे एकाच विमानाने मुंबईत, भाजपा प्रवेशाची चर्चा

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – काँग्रेसमधून बाहेर पडलेले सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार भाजापाचा झेंडा हाती घेण्याची शक्यता आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार हे एकाच विमानातून मुंबईला रवाना झाले. त्यापू्र्वी अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे यांच्यात बुधवारी (दि. 3 एप्रिल) रात्री औरंगाबादमधील चिकलठाणा विमानतळावरील व्हीआयपी कक्षात अर्धा तास बैठक झाली. त्यानंतर ते मुंबईसाठी रवाना झाले.

रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार यांच्या भेटीवेळी जलसंधारण मंत्री राम शिंदे हेही उपस्थित होते. भाजापामध्ये इकमिंग सुरुच असल्याचं चित्र दिसत आहे. अशात आता भाजापात सुरु असलेल्या इनकमिंगमध्ये अब्दुल सत्तार यांच्या नावाचाही समावेश होणार का ? असे प्रश्न समोर येताना दिसत आहेत.

अब्दुल सत्तार हे औरंगाबादमधून निवडणूक लढण्यास इच्छुक होते. परंतु पक्षाने मात्र सुभाष झांबड यांच्या नावाला पसंती दिली. त्यानंतर नाराज झालेल्या सत्तार यांनी काँग्रेसला रामराम ठोकला त्यानंतर त्यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर केली. त्यापूर्वी त्यांनी 23 मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार यांच्यात पुन्हा बैठक झाली आहे. त्यामुळे आता अब्दुल सत्तार आपल्या हाती कमळ घेणार का या चर्चेला उधाण आलं आहे.