नागरिकत्व सुधारणा विधेयक मागे घ्या, बॉलिवूडच्या सेलिब्रेटींसह 727 बुध्दिजीवींचं सरकारला पत्र

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काल लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयक भाजपने संमत केले आज राज्यसभेत हे बिल मांडले जाणार आहे. मात्र याबाबतचे पडसाद आता देशभरातून उमटायला सुरुवात झाली आहे. अनेक बुद्धिजीवी वर्गाने या विधेयकाला विरोध दर्शवल्याचे पाहायला मिळत आहे. माजी न्यायधीश, वकील, लेखक, अभिनेता आणि सामाजिक कार्यकर्ते अशा 727 प्रसिद्ध व्यक्तींनी आपला विरोध दर्शवला आहे.

जावेद अख्तर, नसरुद्दीन शहा, ऍडमिरल रामदास अशा प्रसिद्ध व्यक्तिमत्वांनी या विधेयकाला आपला विरोध दर्शवला आहे. अशा प्रकारच्या प्रसिद्ध व्यक्तींनी सरकारला पत्र लिहून हे विधेयक मागे घेण्याची मागणी केली आहे.

काय म्हणलंय सरकारला नेमकं या पत्राद्वारे
नागरिकत्व सुधारणा विधेयक भारताच्या सर्वसमावेशक आणि सर्वांगीण दृष्टीकोनाचा भंग करीत आहे.
ज्याद्वारे भारताला स्वातंत्र्यलढ्यात मार्गदर्शन मिळाले. आम्ही हे विधेयक सांस्कृतिक आणि शैक्षणिक समुदायांचे विभाजनशील, भेदभाव करणारे आणि असंवैधानिक असल्याचे मानतो आणि यामुळे भारताच्या लोकशाहीला नुकसान पोहोचले, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

याशिवाय, प्रस्तावित कायदा भारतीय प्रजासत्ताकाच्या मुख्य स्वरूपामध्ये मूलत: बदल करेल आणि यामुळे संविधानाद्वारे सादर केलेल्या सांघिक संरचनेला धोका निर्माण होईल, असेदेखील या पत्रातुन सांगण्यात आलेले आहे.

पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातून भारतात आलेल्या बिगर मुस्लिम निर्वासितांना भारतीय नागरिकत्व बहाल करणारे नागरिकत्व सुधारणा विधेयक गेल्या सोमवारी रात्री उशिरा लोकसभेत मंजूर झाले. हे विधेयक 311 विरुद्ध 80 अशा फरकाने मंजूर झाले. यानंतर आता केंद्र सरकार हे विधेयक राज्यसभेत सादर करणार आहे.

यासाठी लिहिलेल्या पत्रात लेखक जावेद अख्तर, अभिनेता नसीरुद्दीन शाह आणि अ‍ॅडमिरल रामदास यांच्याशिवाय इतिहासकार रोमिला थापर, अभिनेत्री नंदिता दास, अपर्णा सेन, सामाजित कार्यकर्ते योगेंद्र यादव, तिस्ता सेटलवाड, अरुणा राय आणि दिल्ली हायकोर्टाचे माजी मुख्य न्यायाधीश एपी शाह आदींचा समावेश आहे.

Visit : policenama.com