माजी न्यायमूर्ती बी.एन. देशमुख यांचं निधन

औरंगाबाद : पोलिसनामा ऑनलाइन – मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती, माजी आमदार बलभीमराव नरसिंगराव देशमुख (बी. एन.) देशमुख (वय ८५) यांचं शुक्रवारी पहाटे दीड वाजता निधन झालं. मागील काही दिसवांपासून ते मूत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त होते. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, दोन नातवंडे असा परिवार आहे.

शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी राज्यसभा सदस्य ॲड. नरसिंहराव देशमुख यांचे पुत्र, माजी खासदार उध्दवराव पाटील यांचे ते भाचे होत. उच्च व सर्वोच्च न्यायालयात वकिली करत असताना राज्य विधान परिषदेवर त्यांची निवड झाली होती. नंतर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. शेतकरी, कष्टकरी, कामगार तसंच सामाजिक प्रश्रावर त्यांनी उच्च न्यायालयात दिलेले अनेक निर्णय ‘ऐतिहासिक’ ठरले होते.

माजी न्यायमूर्ती बी. एन. देशमुख यांचं मूळ गाव तुळजापूर तालुक्यातील काठी हे गाव. त्यांचे वडील उस्मानाबाद येथे नामवंत वकील होते. त्यांचं १० वी पर्यंतच शिक्षण सोलापुरात झाले. तर महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे झाले. त्यांचे पुढील शिक्षण इंग्लंड येथे झाले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दिवंगत रामराव आदिक यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई उच्च न्यायालयात वकिली व्यवसायाला सुरुवात केली. तसेच औरंगाबाद येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, यासाठी त्यांचा आग्रह होता. औरंगाबादला खंडपीठाचे आवश्यकता का आहे, हे त्यांनी अनेकदा पटवून दिलं होते. औरंगाबाद येथे खंडपीठ सुरु झाल्याबरोबरच त्यांनी मुंबई येथील वकिली व्यवसाय बंद केला. औरंगाबाद येथे आले तिथं त्यांनी वकिली सुरु केली. १९७६ मध्ये त्यांची न्यायमूर्तीपदी नेमणूक झाली. ऊस पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून त्यांनी महत्त्वपूर्ण निकाल दिले. १९९७ मध्ये उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून ते निवृत्त झाले.

कालांतराने त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये आपल्या वकिलीस प्रारंभ केला. वयाला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील वकिली व्यवसाय बंद केला. त्यानंतर त्यांनी दिल्ली सोडून औरंगाबादला स्थायिक झाले. विधान परिषदेत सहा वर्षे त्यांनी शेतकरी कामगार पक्षाचे प्रतिनिधित्व केलं. या काळात राज्यातील अनेक महत्वाच्या प्रश्नावर त्यांनी आवाज उठवला होता.