‘राज्यातील सरकार म्हणजे एका नवर्‍याच्या 2 बायका’, ‘या’ माजी मंत्र्यानं केला महाविकास सरकारवर ‘हल्लाबोल’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील महाविकास आघाडी सरकार प्रत्यक्षात तिघाडी सरकार आहे. एका नवऱ्याच्या दोन बायका अशी सरकारची अवस्था आहे. याचा खेळ आवरत आलेला असून हे सरकार कधी कोसळेल याचा पत्ता लागणार नाही, अशी घणाघाती टीका माजी मंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनी आज (शनिवार) केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दुधाला दरवाढ देण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. त्यावेळी ते बोलत होते.

दुधाच्या खरेदी दरात वाढ करण्याच्या मागणीसाठी भाजपसह मित्र पक्षांनी राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे. कर्जत तालुक्यातील माहीजळगाव येथे रस्ता रोको करण्यात आला. यानंतर सरकारच्या विरोधात घोषणा देत सरकाररुपी दगडाला प्रतिकात्मक दुग्धाभिषेक करण्यात आला. यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधाताना राम शिंदे यांनी राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारवर निशाणा साधत घणाघाती टीका केली. राम शिंदे म्हणाले, दुधाचा दर कमी झाला आहे. दुधाची खरेदी अतिशय कमी दराने होत आहे. विक्री मात्र 50 ते 60 रुपयांनी होत आहे. सरकारनं यात मध्यस्थी करण्याची गरज होती. 21 जुलैला आम्ही या संदर्भात निवेदन दिलं होतं. मात्र, त्यावर ना कोणती चर्चा झाली ना निर्णय झाला. त्यामुळे आमच्यावर ही आंदोलनाची वेळ आली असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले.

राज्यातील हे सरकार सपशेल अपयशी ठरलेलं आहे. शेतकरी रस्त्यावर आलेला आहे. दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. विजेची बिलं अव्वाच्या सव्वा येत आहेत. शेतकऱ्यांना युरिया मिळत नाही. कांद्याचा भाव कमी झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची मदत सरकारकडून मिळताना दिसत नाही. सरकारला जनतेचं आणि शेतकऱ्यांचे काहीही देणंघेणं नाही. हे सरकार कधी कोसळेल याचा पत्ता लागणार नाही. मागील आठ महिन्यामध्ये सरकारने लोकांच्या हिताचा एकही निर्णय घेतला नसल्याचे राम शिंदे म्हणाले.