Kolhapur News : तनिष्क ज्वेलर्स चोरी प्रकरणात 3 महिलांसह चार परप्रांतीयांना अटक

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोल्हापूर शहरातील दसरा चौकात असलेल्या तनिष्क ज्वेलर्स दुकानात चोरीचा प्रकार घडला होता. पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपींचा तपास करुन अवघ्या बारा तासात चौघांना अटक केली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये 3 महिलांचा समावेश असून शाहापुरीतील एका हॉटेलवर छापा टाकून चार परप्रांतीयांना अटक केली. संशयतियांनी कोल्हापूरसह पुण्यातील आणखी दोन तनिष्क ज्वेलर्समध्येही चोरी केल्याचे निष्पन्न झाले. तिन्हीही चोरीतील 105 ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण 11 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

संजू रवींद्र गुप्ता (वय-35 रा. बरी तहसिल, जि. कानपूर, उत्तर प्रदेश), सरिता राजाराम शर्मा (वय -25), आयुषी गुलाब शर्मा (वय-25 दोघी रा. रॉबर्टगंज, जि. सोनभद्र, उत्तर प्रदेश सध्या. रा. बोरीवली वेस्ट, मुंबई), एजाज रियाज घान (वय-33 रा. पोस्ट ऑफिस रोड, जि. चिकलपालअबुल कर्नाटक, सध्या रा. बेंगलोर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

मंगळवारी दुपारी रिक्षातून आलेल्या तीन महिला ग्राहकांनी कोल्हापुरातील दसरा चौकात असलेल्या तनिष्क ज्वेलर्स दुकानात जाऊन सोने खरेदीच्या बहाण्याने सेल्मनची नजर चुकवून 37 ग्रॅम 700 मि.ली. वजनाच्या सोन्याच्या दोन बांगड्या लंपास केल्या होत्या. दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रिक्षाचलाकाला शोधून काढले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत आरोपी बेकर गल्लीतील हॉटेलमध्ये थांबले असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी मध्यरात्री हॉटेलवर छापा टाकून आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून 105 ग्रॅमच्या सोन्याच्या सहा बांगड्या आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त केले.

पुण्यातील दोन तनिष्क ज्वेलर्समध्येही चोरी

संशयित आरोपींनी कोल्हापुरामध्ये येण्यापूर्वी पुण्यातील तसेच पुणे नगर रोडवरील अशा दोन तनिष्क ज्वेलर्समध्येही मंगळवारी सकाळी चोरी केल्याचे निष्पन्न झाले. संशयित शिर्डी येथेही गेले, मात्र तेथून चोरीची कोणतीही तक्रार नसल्याचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले, पोलीस कर्मचारी चंदू नन्नवरे, सचिन गुरखे, नितीन चैथे, वसंत पिंगळे, सोमनाथ पाटील, रवींद्र पाटील, संजय पडवळ, वैशाली पाटील, सुप्रीया कात्रट यांच्या पथकाने केली.