Corona काळामध्ये ‘ऑक्सिजन’चा काळाबाजार होत नाही ना ? उद्योग वर्तुळात शंका उपस्थित

नगर : पोलीसनामा ऑनलाइन – सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग होत आहे. त्यामुळे याची भीती अनेकांत बसली आहे. या कोरोना काळात रुग्णाला ऑक्सिजनची अधिक प्रमाणात आवश्यकता भासते. याच काळात ऑक्सिजनचा काळाबाजार होत तर नाही ना? अशी शंका आता वर्तुळात उपस्थित होत आहे.

रुग्णालयांना ऑक्सिजन कमी पडू नये, यासाठी राज्य सरकारने उद्योग क्षेत्राचा ऑक्सिजन पुरवठा कमी केलाय. मात्र, अशी परिस्थिती ओढावण्यामागे वेगळे कारण आहे, असा संशय उद्योजकांनी व्यक्त केलाय. वैद्यकीय क्षेत्राला लागणारा ऑक्सिजन पुरवठा करणारी यंत्रणा आणि उत्पादक यांच्यातील काही त्रुटी असाव्यात. तसेच उपलब्ध असताना अतिरिक्त साठा होत नाही ना ? काही काळाबाजार तर होत नाही ना? याची राज्य सरकारने चौकशी करावी, अशी मागणी नगरच्या उद्योजकांच्या संघटनेने केलीय.

ऑक्सिजन पुरवठ्याचे नियमन करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आलीय. या सामितीच्या बैठकीमध्ये उद्योजकांनी आपली भूमिका मांडलीय. लॉकडाऊनच्या काळात लघु आणि मध्यम स्वरूपाच्या कारखान्यांनी कोणत्याही प्रकारची कामगार कपात न करता त्यांना बेरोजगार होऊ दिलेले नाही. आता देश अनलॉककडे वाटचाल करीत आहे. त्यामुळे परिस्थिती पूर्वपदावर येण्यास मदत होतेय.

औद्योगिक क्षेत्रालाही नवसंजीवनी मिळावी, म्हणून केंद्र आणि राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहे. त्यांचे काटेकोर पालन करीत कारखानदार पूर्वपदावर येताहेत. असे असताना उद्योजकांसमोर ऑक्सिजनचे नवे संकट उभे ठाकले आहे.

कारखानदारांना मटेरियल आणि लेझर कटिंग आणि इतर अनेक बाबींसाठी ऑक्सिजन लागत असते. परंतु आरोग्य क्षेत्रात ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. ऑक्सिजन अत्यावश्यक गरज झालीय. यांच्याशी हि संघटना सहमत असून पूर्ण सहकार्य करीत आहे. परंतु केंद्राच्या नियमानुसार आरोग्यासाठी 80 टकके आणि औद्योगिकसाठी 20 टक्के ऑक्सिजन पुरवठा करावा, असे ऑक्सिजन उत्पादकांना सरकारने कळविले आहे.

पुरवठ्यामध्ये त्रुटी असतीस तर त्या दूर करून आम्हा कारखानदारांना आवश्यक असणारा ऑक्सिजन सिलेंडर वैद्यकीय क्षेत्राला कमी न पडू देता उपलब्ध करून द्यावा आणि कारखानदारांना न्याय द्यावा. जेणेकरून पूर्वपदावर येत असलेली औद्यागिक वसाहत सुरळीत चालेल. अन्यथा, ऑक्सिजन नसल्याने उद्योजकांना कारखाने बंद ठेवावे लागतील. परिणामी, त्यावर अधिक संख्येने अवलंबून असणारे कामगार बेरोजगार होतील, असे निवेदनामध्ये म्हटले आहे.