नितेश राणेंची मंत्री आदित्य ठाकरेंवर खरमरीत टीका, म्हणाले – ‘थोडी लाज असेल तर…’

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन  –  राज्यातील ठाकरे सरकार कोरोना संसर्गाची परिस्थिती हाताळण्यास अपयशी ठरल्याचा आरोप करत महाराष्ट्र भाजपानं आज सरकारविरोधात ‘महाराष्ट्र वाचावा’ आंदोलन केलं. या आंदोलनात राज्यातील सर्व प्रमुख नेत्यांनी सहभाग नोंदवला. मुंबईत प्रदेश कार्यालयाबाहेर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकार वरती टीकास्त्र सोडलं. यानंतर पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी देखील भाजपाच्या या आंदोलनावरती अप्रत्यक्षरीत्या टीका केली होती. त्या टीकेला आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत उत्तरं दिल आहे.

आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत म्हटलं की, सत्तेच्या राजकारणासाठी चाललेलं हे आंदोलन अत्यंत लाजिरवाणं आहे. कोरोनाला विसरुन राजकारण प्रिय असल्याचं भाजपने दाखवून दिलयं असं म्हणत त्यांनी एक फोटो शेअर केला. त्यात लहान मुलांना उन्हात उभं करून त्यांच्या सुरक्षितेची काळजी घेतली जात नसल्याचं दिसलं. या मुलांच्या तोंडावर नीट मास्कही झाकण्यात आलेलं दिसत नाही. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या लहान मुलांना सुरक्षित ठेवणे गरजेचं असताना, हे काय चाललंय? कोरोना को भूल गये, पॉलिटिक्स प्यारा है असं आदित्य म्हणाले.

तसेच जगभरातील नागरिक सर्वकाही विसरून कोरोनाच्या महामारीविरुद्ध लढत असताना. मात्र, एका राजकीय पक्षाच्या राज्यातील नेत्यांनी एक खालच्या पातळीचा विश्वविक्रमच बनवला आहे. सध्या राजकारणात गुंतलेला तो जगातील एकमेव पक्ष असून भीती, तिरस्कार आणि विभाजनाची रणनीती या पक्षाकडून सुरु असल्याचं दिसत आहे. असेही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, आदित्य यांनी केलेल्या केलेल्या ट्विटला आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी म्हटलं, शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी खालील पातळीचा विश्वविक्रम याबद्दल बोलूच नये, कारण त्यांच्या मुख्यमंत्र्यामुळे… महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढती संख्या ही न्यूयॉर्कच्या बरोबरीने आहे. जर थोडी लाज असेल तर काहीतरी काम करा आणि आम्हाला या महामारीच्या संकटापासून वाचवा, असं राणेंनी म्हटलंय. तसंच आदित्य यांनी ट्विट केलेल्या दुसऱ्या फोटो वरूनदेखील नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांनाच लक्ष केल्याचं दिसत आहे. जर, सत्तेची लालसा मुलाला पर्यावरणमंत्री आणि मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न कुठलेही कष्ट न घेता पूर्ण करून शकते. तर, सर्वकाही शक्य आहे मित्र.. असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.