मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे. फळबाग पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठीच्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी या पत्रात लिहले आहे. फळपिक विमा योजनेतील निकष वास्तव नैसर्गिक परिस्थितीला धरून नाहीत. त्यामुळे, फळपिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी की कंपन्यांच्या लाभासाठी ? असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला आहे.
फळपिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी की कंपन्याच्या लाभासाठी ॽ
फळपिक विमा योजनेतील निकष वास्तव नैसर्गिक परिस्थितीला धरून नाहीत….
शेतकरी योजनेपासून परावृत होतोय…निकष तातडीने बदला.. pic.twitter.com/tw18ChKdCW— Radhakrishna Vikhe Patil (@RVikhePatil) July 9, 2020
राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की, शासनाने राबविलेल्या फळबाग योजनेमुळे राज्यात फळपिकांची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे.
फळपिकांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीस निश्चित हातभार लाभलेला आहे. तथापी बदलत्या हवामानामुळे नैसर्गिक आपत्तीत होणारे नुकसान आणि होणारा तोटाही निश्चितच जास्त असतो. शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्याच्या उद्देशाने फळपिकांसाठी हवामान आधारित फळपीक योजना राज्यात राबवण्यात येत आहे.
2020 साली राबवण्यात येणाऱ्या फळपिक विमा योजनेचा दिनांक 5 जून 2020 या कृषी विभागाच्या शासन निर्णयाचे अवलोकन केले असता, सदरची विमा योजना शेतकऱ्यांच्या हिताची नसून विमा कंपन्यांचे हित संवर्धन करणारी असल्याचे दिसते. या योजनेतील निकष बदलण्यात यावेत, अशी मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. या शासन निर्णयानुसार शेतकरी योजनेपासून परावृत्त होतोय. त्यामुळे निकष तातडीने बदला, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.