बनावट लग्न करून फरार झालेल्या टोळीचा पर्दाफाश, ‘त्या’ आंटीसह 3 खोट्या नवऱ्या ‘गोत्यात’

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – बनावट लग्न करून लाखो रुपयांना चुना लावणा-या टोळीचा चंदनझिरा पोलिसांनी मंगळवारी (दि. 19) पर्दाफाश केला आहे. तीन खोट्या नवऱ्या, टोळीप्रमुख महिलेसह एकास अटक केली आहे. त्यांच्याकडून 4 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. टोळी प्रमुख महिलेने आतापर्यंत औरंगाबाद, बीड व बुलडाणा जिल्ह्यांत बनावट लग्न करून अनेकांना फसवल्याचे तपासात समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी गुजरात येथील तीन युवकांसोबत बनावट लग्न करून तीन मुली पळून गेल्याची तक्रार गुजरात येथील पीयूष वसंत यांनी चंदनझिरा पोलीस ठाण्यात दिली होती. सदरील गुन्ह्याचा तपास करताना बनावट नवरी बनलेली मुलगी जालना शहरातील शनिमंदिर येथे आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, सदरील मुलीला ताब्यात घेतले. त्या मुलीला अधिक विचारपूस केली असता, तिने बनावट लग्न केल्याची कबुली दिली. तसेच तिने इतर महिलांची नावे व राहण्याचे ठिकाण सांगितले.

त्यानुसार औरंगाबाद, बुलडाणा, जालना येथून तीनही महिलांना ताब्यात घेण्यात आले. तसेच नवरीचा भाऊ बनून त्यांच्यासोबत असणारा राहुल म्हस्के (रा. नागेवाडी) याला नागेवाडी टोलनाका येथून अटक केली आहे. त्याच्याकडून 5 महागडे मोबाइल, बॅग, रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेली क्रूझर गाडी असा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान, सर्वच आरोपींना पो. निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले, पोलीस कर्मचारी अनिल काळे, विजय साळवे व महिला नाईक रेखा वाघमारे यांनी ही कारवाई केली आहे.