तारापूर एमआयडीसीत वायुगळती; तीन कामगारांचा मृत्यू

तारापूर (पालघर) : पोलीसनामा ऑनलाइन – पालघर जिल्ह्यातील तारापूर एमआयडीसीतील केमिकल कंपनीत रासायनिक प्रक्रिया सुरु असताना विषारी वायूची गळती झाली. यामध्ये तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

कामगारांना विषारी वायूची लागण झाल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी त्यांची तपासणी करणाऱ्या डॉक्टरांना विषारी वायूची लागण झाली. त्यामुळे डॉक्टरांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एस्क्वायर केमिकल कंपनीमध्ये रासायनिक प्रक्रिया करताना वायुगळती झाली. यामुळे तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर या कामगारांना औद्योगिक क्षेत्रातील तुंगा रुग्णालयात आणल्यानंतर संबंधीत रासायनिक वायुचा रुग्णालयातील इतरांनाही त्रास जाणवू लागला. कामगारांच्या मृतदेहाची तपासणी करत असताना डॉक्टरांना चक्कर आल्याने त्यांना अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले.