शाहीद आफ्रिदीचे पुन्हा गौतम गंभीरविषयी ‘खळबळजनक’ वक्तव्य

लाहोर : वृत्तसंस्था – पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदी भारताचा फलंदाज तसेच नवनिर्वाचित खासदार गौतम गंभीर याला डिवचण्याचा एकही संधी सोडत नाही. गौतम गंभीरबाबत शाहीद आफ्रिदी पुन्हा एकदा बरळला आहे. गौतम गंभीरला दिल्लीतील मतदारांनी अक्कल नसलेल्या माणसाला मतदान केले आहे, असे विधान आफ्रिदी याने केले आहे. एका पत्रकार परिषदेमध्ये तो बोलत होता.

पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानशी कुठल्याही प्रकारचे संबंध ठेवू नयेत. तसेच विश्वचषकातही पाकिस्तानविरोधात सामना खेळू नये असे गंभीरने म्हटले होते. त्यावरून वाद उकरून काढत आफ्रिदी म्हणाला की , हे विधान जर गंभीरने केले असेल तर त्याच्या अकलेवरून वाटतं का त्याने कुठली शहाणपणाची गोष्ट केली आहे, असे वाटते का? सुशिक्षित लोक अशी वक्तव्ये करतात का? त्याने केलेले वक्तव्य मुर्खपणाचे आहे आणि लोकांनी अशा व्यक्तीला मतदान केले आहे, ज्याला अक्लल नाही आहे.

भाजपाच्या तिकिटावर पूर्व दिल्लीतून उभ्या राहिलेल्या गंभीरने ६ लाख ९६ हजार १५६ मतांसह विजय मिळवला आहे.यामुळे शाहीद आफ्रिदीचा जळफळाट झाला आहे. म्हणून त्याने गौतम गंभीरवर टीका केली आहे.

शाहीद आफ्रिदी आणि गौतम गंभीर वाद –

कानपूरमध्ये २००७ मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात गंभीर आणि आफ्रिदीमध्ये वाद झाला होता. खेळांच्या नियमांचा भंग करुन मैदानात वाद घातल्याबद्दल आयसीसीने दोघांनाही दंड ठोठावला होता. यासह इतरही काही सामन्यात गंभीर व आफ्रिदीत खटके उडाले होते. आफ्रिदी आणि गंभीर यांच्यात अनेकदा मैदानावरही शाब्दीक चकमक झालेली पाहायला मिळाली आहे. आता इतक्या वर्षांनंतरही या दोन खेळाडूंमध्ये मैदानाबाहेरही वाद सुरूच आहे.