मुख्यमंत्री साहेब, पप्पांची फसवणूक झाली, त्यांचे संकट दूर करा… तिसरीच्या मुलीने लिहिले पत्र

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री साहेब, पप्पांची फसवणूक झाली, त्यांच्यावरचे संकट दूर करा, आमच्या पप्पांची फसवणूक झाली. ते आत्महत्या करतील असे वाटत आहे. त्यांच्यावरचे संकट दूर करा,’ असे नमूद करत कडकनाथ कोंबडी पालनामध्ये फसगत झालेल्या कळंब तालुक्यातील शेतकरी पित्याच्या तिसरीत शिकणाऱ्या लेकीने शुभेच्छा पत्रातून मुख्यमंत्र्यांकडे व्यथा मांडली आहे.

विशेष म्हणजे शाळेत शुभेच्छा पत्रांची स्पर्धा असताना तिने हे पत्र लिहिले आहे. देवळाली येथील आश्रुबा पांडुरंग बिक्कड यांनी कडकनाथ कोंबड्या देण्याच्या व्यवहारात एका कंपनीकडून चार लाखांची फसवणूक झाली. यामुळे घरात तणावाचे वातावरण आहे. सातत्याने चिडचिड, आईवडिलांचे वाद होत आहेत. याचाच परिणाम त्यांची मुलगी धनश्री हिच्यावर झाला. धनश्री गावातील जि. प. प्राथमिक शाळेत तिसरीत शिकते. २६ जानेवारीनिमित्त शाळेत शुभेच्छा पत्रांची स्पर्धा झाली. यावेळी धनश्रीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा पत्र लिहून आमच्या पप्पाला वाचवा, अशी विनंती केली आहे.

letter

तिने पत्र लिहिले…मुख्यमंत्री साहेब आपणास सा. नमस्कार.. सर्वात पहिले तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, माझे नाव धनश्री आश्रुबा बिक्कड शाळा देवळाली येथे शिकत आहे. साहेब माझे पप्पा शेतकरी आहेत, पण आमच्या उस्मानाबाद जिल्ह्यात पेरणीच्या वेळेस पाऊस नसतो. मग शेतात काही धान उगवत नाही. पप्पा नेहमी टेन्शनमध्ये असतात, चिडचिड करतात. मम्मीवर रागावतात. माझ्यावर चिडतात. त्यांच्या तोंडून एकच शब्द निघतो कडकनाथ घोटाळ्यामुळे वाटोळे केलं, कडकनाथ कोंबडीच्या घोटाळ्यात लई पैसे अडकलं, नेहमी मेलेले बरे याशिवाय दुसरा पर्याय नाही असं सारखं बोलतात. साहेब मला लय घाबरायला होते. मला फार भीती वाटते. आमच्या शाळेत वाचण्यासाठी पेपर येतो. त्यात पण शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या बातम्या येतात. साहेब आमच्या पप्पाला तुम्ही समजून सांगा. त्यांना त्या कडकनाथ कोंबडीसाठी दिलेल्या पैसे मिळवून द्या. प्लीज माझ्या पप्पाला मदत करा आमच्या सरांनी सांगितले की तुम्ही मुख्यमंत्री साहेबांना २६ जानेवारीनिमित्त शुभेच्छा पत्र पाठवा म्हणून मी हे पत्र तुम्हाला लिहिले. चूक भूल माफ करा. तुमची विश्वासू धनश्री…

फेसबुक पेज लाईक करा –