प्रियकरासोबत राहण्यासाठी प्रेयसीनं सोडलं घर, गाठलं क्वारंटाईन सेटंर अन्…

पूर्वी सिंहभूम/ झारखंड : वृत्तसंस्था – प्रेम अंधळं असतं असे म्हणतात. प्रेमासाठी काहीही करण्यासाठी प्रेमीयुगुल तयार असते. अशीच एक घटना झारखंडमध्ये समोर आली आहे. झारखंडच्या घाटशिलामधल्या नुतनडीहच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये सध्या एक प्रेमीयुगुल असून याची चर्चा सध्या परिसरात सुरु आहे. हे दोघे दिवसभर एकमेकांना पाहत राहतात. प्रेमाच्या गोष्टी करतात. त्यांच्या शेजारी अनेक प्रवासी मजूर आहेत. मात्र त्यामुळे प्रेमी युगुलाला कोणतीच अडचण होत नाही.

आंध्र प्रदेशमध्ये कामासाठी गेलेला प्रियकर माघारी परतला असून त्याला क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती प्रियसीला मिळाली. गावात राहणाऱ्या प्रियसीनं लगेच क्वारंटाईन सेंटर गाठलं. या दोघांचे कुटुंबीय त्यांच्यावर नाराज आहेत. त्यांचं लग्न व्हावं, असे दोन्ही कुटुंबाला वाटत नाही. प्रेयसीच्या कुटुंबाने क्वारंटाईन सेंटर गाठून दोघांना बरंच काही सुनावलं. त्यानंतर प्रेमी युगुल क्वारंटाईन सेंटर सोडून पळून गेलं. मात्र, दुसऱ्याच दिवशी ते पुन्हा क्वारंटाईन सेंटरमध्ये परतले. त्यानंतर ग्रामस्थांच्या सांगण्यावरून प्रेयसीला देखील क्वारंटाइन सेटंरमध्य ठेवण्यात आलं.

या प्रकरणाची माहिती मिळताच घाटशिलाच्या अधिकाऱ्यांनी क्वारंटाईन सेंटर गाठलं. त्यांनी प्रेमीयुगुलाची माहिती घेतली. संपूर्ण प्रकरण क्वारंटाईन केंद्राशी संबंधित असल्यानं परिस्थितीची माहिती घेण्यात आल्याचे अधिकारी संजय कुमार दास यांनी सांगितलं. नूतनडीह क्वारंटाईन सेंटरमध्ये सध्या 22 जण आहेत. सर्वांना होम क्वारंटाईनमध्ये राहण्यास सांगितले आहे. परंतु ग्रामस्थांनी गावात प्रवेश नाकारल्याने मजुरांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे.

मूळचा नूतनडीहचा रहिवासी असलेला चंद्रमोहन आणि त्याची प्रेयसी यांनी दोन वर्षापूर्वीच लग्न केल्याची माहिती संजय दास यांनी केलेल्या चौकशीतून पुढे आली आहे. त्या दोघांसोबत राहण्याची इच्छा आहे. मात्र, त्यांचे कुटुंबीय त्यांना एकत्र राहण्यास विरोध करत आहेत. त्यामुळे सध्या ते क्वारंटाईन सेंटरमध्ये एकत्र राहात आहेत.