दोनपेक्षा अधिक मुलं होऊ द्या, इन्सेन्टिव देऊ

विजयवाडा : वृत्तसंस्था- आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनी एक हटके घोषणा केली आहे. दोन किंवा दोनपेक्षा अधिक अपत्य होऊ द्या, असं आवाहन आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी तरुण जोडप्यांना केलं आहे. एवढचं नव्हे तर दोन किंवा दोनहून अधिक अपत्यांना जन्म देणाऱ्या जोडप्यांना इन्सेन्टिव देण्याची घोषणाही त्यांनी केली आहे. यासोबतच दोनपेक्षा अधिक अपत्य असणाऱ्या उमेदवारांना निवडणूक लढता येणार नाही, हा नियमही त्यांनी रद्द केलाय. नायडू यांनी अशा प्रकारची घोषणा करून कुटुंब नियोजन पद्धतीच्या नियमांचं उल्लंघन केल्यानं अनेकांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

राज्यात गेल्या १० वर्षांमध्ये १.६ टक्के एवढी लोकसंख्येत घट झाली आहे. जेवढी तोंड खाणारी असतील त्यापेक्षा कमावते हात कमी पडतील, अशी परिस्थिती उद्भवू देऊ नका, असंही आवाहनही चंद्राबाबूंनी जनतेला केलं आहे. राज्यातल्या लोकसंख्येपैकी ५० टक्के लोकसंख्या ही तरुण पिढीची आहे. राज्याला चिरतरुण ठेवण्यासाठी जास्तीत जास्त मुलं जन्माला घातली पाहिजेत, असंही ते म्हणाले आहेत.

आंध्रातील बालमृत्यू दरही घसरला असल्याचे सांगत राज्याला तरुण ठेवण्यासाठी जन्मदर वाढवणं गरजेचं आहे, असे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनी स्पष्ट केलं.