मताधिक्य द्या अन्यथा… काँग्रेसची नेत्यांना तंबी

अमृतसर : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून प्रयत्न केले जात आहेत. याच दरम्यान पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी स्वपक्षीय नेत्यांना आणि मंत्र्यांना इशारा दिला आहे. अमरिंदर सिंह यांनी पंजाब कॅबिनेटमधील मंत्र्यांना, नेत्यांना आणि आमदारांना आपापल्या लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला जास्तीत जास्त आघाडी मिळवून देण्याचे सांगितले आहे. जर तसे झाले नाही तर त्या नेत्याचे मंत्रीपद काढून घेईन असा इशारा त्यांनी दिला आहे.

ज्या जिल्ह्यात त्यांचा प्रभाव आहे अशा ठिकाणी मताधिक्य मिळाले नाही तर ते नेते मंत्रीपद गमावू शकतात असा कडक इशारा त्यांनी पक्षातील नेत्यांना दिला आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत नेत्यांवर मोठी जबाबदारी असणार तर आहेच. तसेच मंत्रीपद टिकवण्याचेही आव्हान असणार आहे. मुख्यमंत्र्यांनी नेत्यांना तंबी देताना म्हटले आहे की, आपण ज्या भागाचे प्रतिनिधित्व करता त्या भागातून काँग्रेसच्या उमेदवाराला जास्त मते मिळाली पाहिजेत. जर मतदान कमी झाले तर पुढच्या विधानसभा निवडणुकीत तिकिट मिळणार नाही. त्यामुळे नेत्यांचे पुढील भवितव्य या लोकसभा निवडणुकीवर अवलंबून असणार आहे.

लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्ष काँग्रेस यांच्यात अटीतटीची लढाई आहे. त्यामुळे निवडणुकीतील प्रत्येक जागा जिंकण्यासाठी दोन्ही पक्ष जोरदार प्रयत्न करत आहे. मात्र, देशातील सत्ता कोणाला द्यायची हे जनतेने दिलेल्या मतदानावर अवलंबून आहे.