सोनं पुन्हा चमकलं, चांदीच्या भावात 1500 रूपयांची ‘घसरण’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन : जागतिक पातळीवर दलाल सक्रिय झाले असल्याने सोन्याच्या किमतीत सतत चढ-उतार होत आहे. याचा परिणाम चांदीवरही होता दिसून येत आहे. गुरुवारी एका दिवसात चांदीच्या भावात दीड हजार रुपये प्रति किलोने घसरण झाली आहे. मात्र, सोन्याच्या भावात ३०० रुपये प्रति तोळ्याने वाढ झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची होणारी घसरण यामुळे सोने-चांदीचे भाव वाढत असल्याचे समजते. यात आणखी भर म्हणजे मुंबई शेअर बाजाराबरोबर विदेशातील शेअर बाजारात सातत्याने होणाऱ्या घसरणीमुळे सोने-चांदीचे भावात तेजी दिसून येत आहे. सोबतच जागतिक पातळीवर दलालही सक्रिय झालेत, ज्यामुळे अचानक खरेदी वाढली आणि दोन्ही धातूंचे भाव एकदम वाढले. त्यात आता चांदीमध्ये खरेदी कमी केल्याने चांदीत थेट दीड हजार रुपये प्रति किलोने घसरण झाली. मागील १२ दिवसांत चांदीचे भाव सातत्याने वाढताना दिसत आहेत. १३ फेब्रुवारी रोजी ४६ हजार रुपये प्रति किलो असलेले चांदीचे भाव १५ रोजी ४७ हजार रुपयांवर पोहोचले. १८ रोजी ते ४७ हजार ५००, २० रोजी ४८ हजार रुपये व २१ रोजी ४९ हजार रुपये प्रति किलोवर पोहोचले. त्यानंतर २६ फेब्रुवारीपर्यंत ते ४९ हजार रुपयांवर स्थिर राहिले. मात्र २७ रोजी थेट दीड हजार रुपयांनी घसरण होऊन चांदी ४७ हजार ५०० रुपये प्रति किलोवर आली.

तसेच दुसरीकडे सोन्याचे भाव सलग दोन दिवस कमी होत गेले. मात्र गुरुवारी त्यात ३०० रुपये प्रति तोळ्याने वाढ होऊन सोने ४३ हजार १०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहे. दरम्यान, जळगाव शहर सराफ असोसिएशनचे अध्यक्ष अजयकुमार ललवाणी यांनी सांगितले कि, जागतिक पातळीवर सोने- चांदीची खरेदी-विक्री कमी जास्त होत असल्याने त्यांच्या भावात चढ-उतार होत आहे. हे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

दलालांची हातचलाखी
सोबतच अमेरिका, युरोपिय देशात दलाल सक्रिय झाल्याने सोने-चांदीचे भाव कमी-जास्त होत असल्याचे साजते, यात आता चांदीचे भाव कमी झाले असले तरी ते आणखी वाढून ५५ हजार रुपये प्रति किलो तर सोने ४५ हजार रुपये प्रति तोळ्यावर पोहोचल्याची शक्यता आहे. हे चित्र दलालांमुळे निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे.