पोलीसनामा ऑनलाइन टीम – केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी मोठा दिलासा दिला आहे. कर्मचा-यांना 1 जुलै 2021 पासून पूर्ण महागाई भत्ता दिला जाणार आहे. तसेच चालू वर्षीचा 3 वेळा थकलेला महागाई भत्ता देखील दिला जाणार असल्याची माहिती अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 9) संसदेत दिली. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा केंद्राच्या 50 लाख कर्मचाऱ्यांबरोबर 65 लाख पेन्शनधारकांना फायदा होणार आहे.
राज्यसभेत एका लिखित उत्तरात ठाकूर यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्याना आणि पेन्शनधारकांना 1 जुलै 2021 पासून पूर्ण महागाई भत्ता दिला जाईल. तसेच यावेळी गेल्या वर्षभरापासून थकलेला 3 वेळच्या भत्ताही दिला जाणार आहे. कोरोना संकटामुळे केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 1 जानेवारी 2020, 1 जुलै 2020 आणि 1 जानेवारी 2021 असे तीन हप्ते रोखले होते. दरम्यान ठाकूर म्हणाले की, 3 वेळचा महागाई भत्ता रोखल्याने सरकारचे जवळपास 37,530.08 रुपये वाचले होते. यामुळे कोरोनाकाळातील आर्थिक संकटाचा सामना करण्यास मदत मिळाली आहे.