राज्य सरकारकडून ‘शेतकऱ्यांना’ दिलासा ! 18 लाख 89 हजार 528 शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची रक्कम जमा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – देशात आणि राज्यात कोरोना विषाणूचे संक्रमण दिवसेंदिवस वाढतच आहे. या प्राणघातक विषाणूचा सामना करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. राज्य सरकारने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक उपाययोजना देखील आखल्या आहे. सध्या राज्यात कोरोनाने थैमान घातले असले तरीही राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती दिली की ३१ मार्च २०२० पर्यंत राज्यातल्या १८ लाख ८९ हजार ५२८ शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण ११ हजार ९६६ कोटी २१ लाख रुपयांची कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली आहे. तसेच जिल्हा सहकारी बँकांच्या माध्यमातून एकूण १० लाख ४० हजार ९३५ शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार ४०७ कोटी १३ लाख जमा करण्यात आले आहेत. तसेच व्यापारी बँकांच्या माध्यमातून ८ लाख ४८ हजार ५९३ शेतकऱ्यांच्या खात्यात ६ हजार ५५९ कोटी ८० हजार रुपये जमा करण्यात आल्याची माहिती देखील अजित पवारांनी दिली आहे.

तसेच अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सांगितले होते की, १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीतील कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना २ लाखापर्यंतच्या लाभाची रक्कम अदा करण्यात येईल. या बरोबरच, सन २०१७ ते २०१९ या कालावधीत ज्या कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी जून २०२० पर्यंत नियमित कर्जाची परतफेड केली आहे, अशा शेतकऱ्यांना २०१८-१९ मध्ये घेतलेल्या पिककर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त ५० हजार रुपयांची रक्कम प्रोत्साहनपर देण्यात येईल. तसेच, अजित पवारांनी सांगितले की ही रक्कम ५० हजार रुपयांपेक्षा कमी असेल तर, कर्ज म्हणून घेतलेल्या रकमेच्या संपूर्ण रक्कम लाभ म्हणून देण्यात येईल.