शेतकऱ्यांना ऊर्जा विभागाचा दिलासा; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई : कृषिपंप वीज जोडणीच्या प्रतीक्षेत शेकडो शेतकरी आहेत. या सर्व शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. नवीन कृषिपंप वीज जोडणी धोरणात मागेल त्या शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यास प्राथमिकता देण्यात आली आहे. तसेच प्रलंबित कृषिपंप वीज जोडणी अर्जावर तात्काळ कार्यवाही करून प्रलंबित अर्जांची संख्या शून्य करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महावितरणला दिले आहेत.

सह्याद्री राज्य अतिथी गृह येथे आढावा बैठक झाली. त्यामध्ये कृषिपंपाना वीज जोडणी देण्याबाबत, वीज जोडण्या देण्यासाठी महावितरणद्वारे राबविण्यात येत असलेल्या योजनांचा आढावा घेतला. त्यानंतर नितीन राऊत बोलत होते. ते म्हणाले, ‘शेतकरी आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाला पाहिजे. शेती व्यवसायाला उद्योगाचा दर्जा मिळाला पाहिजे, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न होते. राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे निर्णय शासनाने घेतले आहेत. त्यावरून शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्याचा प्रयत्न आहे’.

दरम्यान, मागेल त्या शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यासाठी वीज वितरण यंत्रणेचे सक्षमीकरण करणे गरजेचे आहे. त्यासाठी पुरेसे वीज उपकेंद्र व रोहित्रे उभारण्यात येणार आहे. शेतीला उद्योगाचा दर्जा प्राप्त झाला पाहिजे हे उद्दिष्टे डोळ्यापुढे ठेऊन नवीन कृषिपंप धोरण व अपारंपरिक ऊर्जा धोरण तयार करण्यात आले आहे, असेही ते म्हणाले.