शेतकर्‍यांसाठी खुशखबर ! मोदी सरकारची ‘ही’ योजना शेतकऱ्यांसाठी लाभदायक, जाणून घ्या होणारे फायदे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक फायद्याच्या योजना सुरु केल्या आहेत त्यामध्ये कुसुम योजना शेतकऱ्यांसाठी अधिक फायद्याची ठरत आहे. या योजनेंतर्गत शेतकरी खडकाळ किंवा नापीक जमिनीवर सौर पॅनल लावून कमाई करु शकतात. तसेच शेताला पाणी देण्यासाठी शेतकरी वीज किंवा डिझेलवर चालणाऱ्या पंपाचा वापर करतात. मात्र हे खर्चीक असल्याने याला पर्यायी आणि फायदेशीर पर्याय म्हणजे शेतात सोलर उपकरण बसवून सिंचन करणे. याशिवाय अतिरिक्त वीज बनवून ती ग्रीडला पाठवून आणखी कमाई करु होऊ शकते.

काय आहे पंतप्रधान कुसुम योजना ?

गेल्यावर्षी नोव्हेंबर 2020 मध्ये केंद्र सरकारने कृषी क्षेत्रात सौरउर्जेचा वापर वाढवण्यसाठी पंतप्रधान कुसुम योजनेचा विस्तार केला होता. पंतप्रधान किसान उर्जा सुरक्षा आणि उत्थान महाभियान योजना नवीन आणि नूतनीकरणयोग्य ऊर्जा मंत्रालयाने सुरु केली. केंद्र सरकारच्या या योजनेच्या माध्यमातून शतकरी त्यांच्या जागेवर सौर पंप बसवून आपल्या शेतासाठी सिंचन करु शकतात. केंद्र सरकारचे उद्दिष्ट हे आहे की, या योजनेंतर्गत देशात विद्युत आणि डिझेलवर चालणाऱ्या पंपाच्या जागी सौरपंप बसवले जावेत.

शेतकऱ्यांना नापीक जमिनीतून उत्पन्न

केंद्र सरकारच्या या योजनेचा दोन प्रकारे लाभ घेतला जाऊ शकतो. पहिला म्हणजे शेतकरी शेतात सिंचनासाठी मोफत वीजेचा वापर करु शकतील. दुसरा फायदा असा की, जर शेतकऱ्यांनी अधिकची वीज बनवली आणि ती ग्रीडवर पाठवली तर त्या बदल्यात शेतकऱ्यांना पैसे मिळू शकतात. म्हणजेच या योजनेतून शेतकऱ्यांना अधिकचे उत्पन्न मिळू शकते. एवढेच नाही तर नापीक जमीन असणारे शेतकरी आपल्या जमीनीत सौर ऊर्जा निर्मिती करुन पैसे कमावू शकतात. म्हणजेच नापीक जमीनीतून देखील शेतकऱ्यांना पैसे कमावता येतील.

सरकारकडून 60 टक्के अनुदान

शेतकऱ्यांना त्यांचे कृषी पंप सौरऊर्जेचे करण्यासाठी सरकारकडून 60 टक्के अनुदान दिले जाणार आहे. ही योजना राज्य सरकारच्या विभागांमार्फत राबविण्यात येत असून त्यामध्ये शेतकऱ्यांना उर्वरित रक्कमेपैकी केवळ 40 टक्के रक्कम विभागाकडे जमा करायची आहे. या विभागांबाबत अतिरिक्त माहिती MNRE ची वेबसाईट www.mnre.gov.in यावर उपलब्ध आहे.