मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या अखेर रद्द करण्यात आल्या आहेत. याबाबत राज्य शासनाने निर्णय घेतल्याने शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनामुळे बदल्या होणार नाहीत, असे शिक्षकांना वाटत असतानाच शासनाने बदल्या करण्यास सांगितले होते. कोरोनामुळेच शिक्षकांनी या बदल्यांची धास्ती घेतली होती. मात्र, शिक्षक संघाच्या मागणीस यश आले आहे. राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचा निर्णय बदलला आहे. यावर्षी फक्त विनंती बदलीचे आदेश दिले आहेत.
शासनाने दिलेल्या आदेशानुसार तसेच तालुकाबाह्य प्रशासकीय बदल्या रद्द करण्यात आल्या आहेत. जुन्या शासन निर्णयामुळे तालुकाबाह्य प्रशासकीय बदलीच्या भीतीने राज्यातील शिक्षक हवालदील झाले होते. विस्थापित शिक्षकांची विनाअट बदली करावी व प्रशासकीय बदल्या रद्द कराव्यात ही प्राथमिक शिक्षक संघाची मागणी होती.
विनंती बदल्या करण्याचे आदेश
राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने याबाबत आज शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. कोरोना आजारामुळे सामाजिक अंतर पाळून फक्त विनंती बदल्या करण्याचे सर्व जिल्हा परिषदांना कळवले असल्याची माहिती सरचिटणीस खंडेराव ढोबळे यांनी दिली.
राज्य सरकारच्या निर्देशानुसार सोयीच्या बदल्यांसाठी जिल्हा परिषदांनी पुढाकार घ्यावा. आंतरजिल्हा बदलीने येणाऱ्या शिक्षकांच्या प्रमाणात समानीकरणाची पदे विनंती बदलीसाठी खुली करावीत. अशी मागणी शिक्षक संघाने केली आहे.