खासगी कारवाल्यांसाठी खुशखबर ! केंद्र सरकारकडून लवकरच खासगी कारचालकांना भाडं घ्यायला मान्यता

पोलीसनामा ऑनलाइन टीम : खासगी कारवाल्यांना केंद्र सरकार खुप मोठी खुशखबर देणार आहे. केंद्र सरकार परिवहन कायद्यामध्ये मोठा बदल करणार असुन त्यामुळे ज्यांच्याकडे स्वतःची कार असेल त्यांना त्याव्दारे अतिरिक्‍त कमई सुरू करता येणार आहे.

एका इंग्रजी दैनिकाने दिलेल्या बातमीनुसार व्हेइकल पूलिंग योजनेचा केंद्र सरकार गांभीर्याने विचार करत आहे.
अलिकडील काळामध्ये देशात खासगी वाहनांची संख्या मोठया प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे ट्रॅफिक आणि पार्किंगची समस्या दिवसेंदिवस जटील बनली आहे.

रस्त्यावरील खासगी वाहनांची संख्या कमी व्हावी, तसेच ट्रॅफिक कमी व्हावे म्हणुन केंद्र सरकारकडून खासगी गाडयांचा वापर व्यावसायिक कारणासाठी करता यावा म्हणून परवाना (परमिट) जारी करण्याचा विचार सुरू आहे. नीति आयोगाने यासाठी एक योजना तयार केली आहे. मात्र, ही सेवा सुरू करण्यासाठी कार मालकांना काही नियम आणि अटींची पुर्तता करावी लागणार आहे. खासगी कारचालक व्यावसायिकदृष्टया दररोज केवळ 3 ते 4 फेर्‍याच करू शकतो, असा नियम त्यामध्ये आहे.

प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या द‍ृष्टीकोनातून देखील खासगी वाहनांसाठी नियम तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी खासगी वाहन चालकांना राज्य परिवहन विभागातील मान्यता प्राप्‍त समिक्षकांकडून KYC (Know Your Customer) प्रक्रिया पुर्ण करून घ्यावी लागणार आहे. समिक्षकांकडे वाहनाचा पूर्ण डाटा असणार आहे. ज्यामुळे कार मालक एका दिवसात 3 किंवा 4 पेक्षत्त जास्त फेर्‍या करू शकणार नाही.

जे कार मालक नियमाचा भंग करतील त्यांच्यावर तातडीने कारवाई केली जाणार आहे. खासगी कार मालकांना व्यावसायिकदृष्टया कारचा वापर करावयाचा असल्यास त्यांना प्रवाशांचा विमाही उतरवावा लागणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडून भाडं निश्‍चित केले जाणार आहे.