Google चे CEO सुंदर पिचाई यांनी वर्तवले भाकित, म्हणाले – ‘भारतात कोरोनामुळे अजून वाईट स्थिती येईल’

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. ऑक्सिजन, इंजेक्शन, बेड, लसीचा तुटवडा जाणवत असल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. अशातच गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी भारताला इशारा देत कोरोना बाबत भाकित वर्तवले आहे. भारतात कोरोना स्थितीचा आणखी वाईट काळ येणार असल्याचे पिचाई यांनी म्हटले आहे.

एका वृत्तवाहिनेला दिलेल्या मुलाखतीत पिचाई बोलत होते. कोरोनामुळे सध्या भारताची अवस्था बिकट बनली आहे. अमेरिकेकडून भारताला मदत मिळत असल्याची चर्चा आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकेन भारतातील स्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी सांगितले. आमचे लक्ष लोकांना खरी आणि योग्य माहिती देण्यावर आहे. त्यामुळे लोकांना मदत मिळेल, असे त्यांनी गुगल कंपनी भारतासाठी काय करते ? या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. दरम्यान गुगलने भारतासाठी 135 कोटींची मदत करणार असल्याची घोषणा पिचाई यांनी केली आहे. दुसऱ्या लाटेत रुग्ण संख्या वाढत असल्याबद्दलही पिचाई यांनी चिंता व्यक्त केली आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, सौदी अरेबिया यासारख्या अनेक देशांनी भारताला मदती संदर्भात आश्वासन दिले आहे. भारतामधील लस निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा करण्यासाठी अडवणूक करणाऱ्या अमेरीकेनेही भारताला सर्वतोपरी मदतीची तयारी दर्शवली आहे. ब्रिटननेही भारताच्या करोनाविरुद्धच्या लढाईत सोबत असल्याचे आणि शक्य ती सर्व मदतीचे आश्वासन भारतातील उच्चायुक्तांच्या माध्यमातून दिले आहे.