विमानसेवा सुरू करण्यास महाराष्ट्र सरकार तयार होईना !

पोलिसनामा ऑनलाईन – देशभरात सुरु असलेल्या कोरोनाचा कहरामुळे दोन महिन्यांपासून बंद असलेली देशांतर्गत विमानसेवा येत्या सोमवारपासून सुरू करण्यात येणार आहे. मात्रा, राज्यात प्रवासी सेवा सुरू करण्यास महाराष्ट्र सरकारने आक्षेप घेतला आहे.

राज्यातील मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद ही शहरे रेडझोनमध्ये येत असल्याने विद्यार्थी, वैद्यकीय किंवा अत्यावश्यक सेवेसाठीच वापर करुन विमानसेवा सुरू करावी, अशी भूमिका सरकारकडून घेण्यात आली आहे. मुंबई विमानतळावरून दररोज 27 हजार 500 प्रवासी ये-जा करतील, अशी आकडेवारी ‘मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड‘ (एम.ए.आय.एल.) या कंपनीने महाराष्ट्र सरकारला सादर केली होती. राज्य शासनाने मुंबई विमानतळावरून प्रवासी सेवा सुरू करण्याबाबतचा आक्षेप मुंबई विमानतळ कंपनीला कळवला आहे. त्यात मुंबई, नागपूर, पुणे आणि औरंगाबाद ही विमानतळे असलेली शहरे रेडझोनमध्ये मोडत असल्याचेही लक्ष वेधण्यात आले आहे. या सर्व शहरांमध्ये वाहतूक आणि इतर सारे निर्बंध कायम आहेत. अशा वेळी विमान प्रवाशांसाठी अपवाद करणे शक्य होणार नाही, असेही राज्य शासनाने कळविले आहे. राज्यात येणारे प्रवासी देशाच्या अन्य प्रतिबंधित क्षेत्रांमधून आल्यास विमानतळावर अडकून पडण्याची भीती आहे. तसेच प्रवासी कुठून येणार याची विमान कंपन्यांनाही काहीही माहिती नाही. महाराष्ट्रातील एकूणच परिस्थिती लक्षात घेता 25 मेपासून प्रवासी सेवा सुरू करणे योग्य होणार नाही. अडकलेले विद्यार्थी वा परदेशी नागरिक, वैद्यकीय सेवा किंवा अत्यावश्यक असेल अशांसाठीच किमान विमानसेवा सुरू करावी, अशी भूमिका राज्य शासनाने मांडली आहे.