प्राणी तस्करांच्या हल्ल्यात 5 वर्षांत तब्बल 162 वनसेवक ‘शहीद’ !

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – देशभरातील जंगल आणि वन्यजीवांचे संरक्षण करताना अपुर्‍या सुविधांअभावी वनखात्यातील अधिकारी, कर्मचारी काम करीत आहेत. मात्र वनाधिकार्‍यांच्या संरक्षणाकडे सरकारचे गेली कित्येक वर्षे दुर्लक्ष होत आहे. 2012 ते 2017 या पाच वर्षांत देशात प्राणी तस्करांच्या हल्ल्यात 162 वनकर्मचारी शहीद झाले.

वनशहीद दिनाच्या निमित्ताने शहिदांच्या कुटुंबीयांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी भारतीय वनसेवा अधिकारी असोसिएशनने केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामानबदलमंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्राद्वारे केली. प्राण्यांच्या आणि तस्करांच्या हल्ल्यात वनकर्मचार्‍यांचा मृत्यू होतो. अनेकदा त्यांना अपंगत्व येते. परिणामी त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबीयांचे भवितव्य धोक्यात येते. काही महिन्यांपूर्वी वर्धा जिल्ह्यात वाळू तस्करांनी वनाधिकार्‍यांवर हल्ला केला. सातत्याने घटना घडत असल्याने वनाधिकारी व कर्मचार्‍यांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक राष्ट्रीय धोरण व मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी आयएफएस असो. चे सरचिटणीस एस. पी. यादव यांनी केली आहे.

भारतात सुमारे 50 हजार क्षेत्रीय कर्मचारी आहेत. कुटुंब आणि समाजसुखापासून दूर राहात, वेळप्रसंगी वैयक्तिक खर्चातून ते वनांचे संरक्षण करतात. असाहाय्य गावकरी आणि वन्यप्राण्यांमधील संरक्षणाची अतूट भिंत म्हणूनही ते कार्यरत असतात. लाकूड तस्कर, वाळू व खाण माफिया, संघटित शिकार्‍यांपासून ते पर्यावरणाचे रक्षण करत असल्याने त्यांचे संरक्षण करण्याची मागणी करण्यात आली आहे.