‘सामना’ ने घेतला यू-टर्न ; सरकाराचे ‘रेकॉर्डब्रेक’ कौतुक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गेली साडेचार वर्षे सरकारच्या कोणत्याही निर्णयावर जबरदस्त टिका करणाऱ्या शिवसेनचे मुखपत्र असलेल्या सामना ने युती झाल्यानंतर १८० कोनातून यू-टर्न घेतला आहे. मोदी, अमित शहा यांच्यावरील टिकेने दिवसाची सुरुवात करणाऱ्या जहाल शिवसेनेची भूमिका आता मवाळ झाल्याचे दिसत आहे. कारण सामना च्या अग्रलेखातून शिवसेनेने भाजपचे रेकॉडब्रेक कौतुक केल्याचे दिसून येत आहे. ब्रेकिंग निर्णय ; अव्वल धोरण ! या मथळ्याखाली शिवसेनेने आज सामनातून अग्रलेख लिहिला असून राज्य मंत्रिमंडळाने रेकॉर्डब्रेक निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे.

खरं तर शिवसेनेकडे उद्योग खाते आहे. आता पाच वर्षे संपायला आल्यानंतर या खात्याचे मंत्री सुभाष देसाई यांनी उद्योग धोरण जाहीर केले आहे. आता दोन दिवसातच आचार संहिता लागणार आहे. लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर काही महिन्यांनी (जर आता एकत्र निवडणुका झाल्या नाही तर) पुन्हा विधानसभेची आचारसंहिता लागू होणार आहे. या धोरणाची अंमलबजावणी करणे कोणालाही शक्य होणार नाही. तरीही अग्रलेखातून त्याचे कौतुक करण्यात आले आहे. खरं तर केवळ धोरण जाहीर करण्यात चार वर्षे गेली तर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी किती वर्षे लागतील, हा खरा प्रश्न आहे. पण तो विचारण्याऐवजी त्याचे कौतुक करण्यात येत आहे.  हे खाते शिवसेनेऐवजी भाजपकडे असते तर अग्रलेखाची भाषा बदलली असती का असा प्रश्न उपस्थित होते आहे.

राज्याचे नवीन उद्योग धोरण सरकारने मंगळवारी जाहीर केले आणि त्याच वेळी मंत्रिमंडळाच्या बैठकीत तब्बल २२ निर्णय घेण्यात आले. जनहिताचे हे निर्णय असोत किंवा राज्यातील रोजगाराच्या संधी वाढविणारे ‘उद्योग धोरण’, त्यात आक्षेप घेण्यासारखे काय आहे ? विद्यापीठे, महाविद्यालयीन शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही सातवा वेतन आयोग लागू करावा ही मागणी होतीच. तिची पूर्तता सरकारने केली आहे. त्याचा लाभ राज्यातील हजारो शिक्षक-शिक्षकेतर कुटुंबांना मिळणार आहे. सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्यात यावे ही मागणीदेखील जुनीच आहे. लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आग्रह शिवसेनेनेच धरला होता. त्यामुळे हेही काम मार्गी लागण्यात शिवसेनेचा वाटा असल्याचे शिवसेना विसरली नाही. यावरून, नेहमीच भाजपाच्या कार्यपद्धतीवर टीका करणारी अन् शेतकरी, पीडित जनेतेची प्रश्न मांडणारी शिवसेना, आता चक्क सरकारचं कौतुक करताना दिसत आहे.

राज्यात तब्बल १० लाख कोटींची गुंतवणूक होत असून सुमारे ४० लाख रोजगारनिर्मिती होणार आहे. उच्च तंत्रज्ञानावर आधारित तसेच रोजगारनिर्मिती करणाऱ्या उद्योगांना चालना दिली जाणार आहे. १८ ते ४५ वयोगटातील पात्र लोकांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण दिले जाईल. शिवाय भविष्यातील औद्योगिक जमिनीची गरज लक्षात घेऊन राज्यात ‘लॅण्ड बँक’देखील निर्माण केली जाणार असल्याचे सामनाच्या अग्रलेखातून म्हटले आहे. तसेच राज्य मंत्रिमंडळाचे ‘रेकॉर्डब्रेक’ निर्णय आणि महाराष्ट्राला पुन्हा ‘नंबर वन’ बनविणारे नवीन उद्योग धोरण याचा फायदा राज्याला आणि जनतेलाच होणार आहे. मात्र, यामुळे विरोधकांना ‘ब्रेक’ लागणार आहे, असे म्हणत शिवसेनेकडून आता सत्ताधाऱ्यांचे रेकॉर्डब्रेक कौतुक करण्याचे काम सुरू झाले आहे. तर, विरोधकांवर टीका करण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या –

गडकरींना राग अनावर … म्हणाले ‘गप्प बसा… नाहीतर थप्पड खाल’ 

हार्दिक पटेल काँग्रेसच्या वाटेवर ; “या” मतदार संघातून लढवणार निवडणूक

पुणे : काॅलेजच्या कॅन्टीनमध्ये ‘त्या’ दोघांचे मृतदेह सापडल्याने खळबळ