‘कोरोना’ रोखण्यासाठी आज मध्यरात्रीपासून राज्यात हा ‘कायदा’ लागू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून देशात देखील कोरोनाची एन्ट्री झाली आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे 17 रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह आली असून त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. राज्यातील जनतेच्या आरोग्याचे हित लक्षात घेता शुक्रवार मध्यरात्रीपासून संसर्गजन्य आजार टाळण्यासाठीचा कायदा लागू केला आहे. राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई, नवी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे आणि नागपूर येथील जीम, चित्रपट आणि नाट्यगृहे, जलतरण तलाव महिन्याच्या अखेरच्या तारखेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

शाळा/महाविद्यालये बंद
कोरोना व्हायरसच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने राज्य सरकारने पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे दहावी आणि बारावीच्या परीक्षा वगळून शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी विधानसभेत निवेदनाद्वारे केले. पहिले ते नववीपर्यंतच्या परीक्षांचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

रुग्णांमध्ये कोरोनाचे सौम्य लक्षणे
राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. मात्र त्यांच्यामध्ये सौम्य स्वरुपाची लक्षणे आढळून येत आहेत. राज्यात 17 रुग्णांमध्ये मुंबईत 3, ठाणे 1, पुणे 10 आणि नागपूरमध्ये 3 रुग्ण आढळून आले आहेत. या 17 व्यक्तींमध्ये 15 जण दुबई, फ्रान्स, अमेरिका येथे प्रवास करून आले आहेत. या सर्वांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

क्वॉरंटाईन करण्याच्या सूचना
राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालये, महापालिका रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले आहे. 15 फेब्रुवारीनंतर चीन, इराण, इटली, दक्षिण कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनी या साद देशातून प्रवास केलेल्या प्रवाशांना पूर्णपणे क्वॉरंटाईन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र राज्यात सापडलेले रुग्ण हे अमेरिका आणि दुबई येथून प्रवास केलेले व्यक्ती आहेत. या दोन देशांचा देखील पूर्णपणे क्वॉरंटाईन करण्याच्या यादीतील देशांमध्ये समावेश करण्याची मागणी राज्य शासनाने केंद्राकडे केली आहे.

या सेवा बंद नाहीत
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता राज्य शासनाने संसर्गजन्य आजार टाळण्यासाठीचा 1897 (2) या कायद्याची अंमलबजावणी शुक्रवार (दि.13 मार्च 2020) च्या मध्यरात्रीपासून करण्याचा निर्णय घेतला आहे. हॉटेल, उपहारगृहे, मॉल्स बंद करण्यात येणार नाही. त्याचबरोबर रेल्वे, बससेवा या अत्यावश्यक सेवेत येत असल्याने बंद करण्यात येणार नाहीत. मात्र नागरिकांनी गर्दी टाळावी असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

राज्यातील सर्व कार्यक्रम रद्द
राज्यात ज्या संस्थांना धार्मिक, सांस्कृतिक, व्यावसायिक आणि क्रीडा विषयक कार्यक्रमांना परवानगी दिली आहे ती रद्द करण्यात येणार असून पुढील आदेश होईपर्यंत कोणतेही कार्यक्रम आयोजित केले जाणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच खासगी क्षेत्रातील कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरूनच काम करण्याची परवानगी द्यावी अशी सूचना देखील देण्यात आली आहे.