Kolhapur News : रेशन कार्डास आधार लिंक न झाल्यास धान्य बंद – जिल्हाधिकारी

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन –   ज्या व्यक्तीने रेशन कार्डाला आधार क्रमांक लिंक नाही केल्यास धान्य बंद करण्यात येणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले आहेत. रेशनकार्डवरील सर्व लाभार्थी व्यक्तींचे शंभर टक्के आधार कार्ड लिंक करणे आणि प्रत्येक रेशनकार्डासाठी किमान एक वैध मोबाइल नंबर ३१ जानेवारीपूर्वी फिड करण्याची जिल्ह्यात ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.

तसेच ज्या व्यक्तीचे आधार कार्ड लिंक होणार नाही, त्यांचेच फक्त धान्य फेब्रुवारीपासून कार्ड लिंक होईपर्यंत थांबवण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी देसाई यांनी सांगितले आहे. एका रेशनकार्डावर पाच व्यक्ती असतील व त्यातील चौघांचे आधार क्रमांक लिंक असतील तर त्यां चौघांना धान्य मिळेल. ज्यांचे आधार क्रमांक लिंक नसतील त्या व्यक्तीला ते दिले जाणार नाही, असेही त्यांनी सांगितल.

जिल्ह्यात ५ लाख ६० हजार रेशन कार्ड आहेत. त्यावरून सुमारे २५ लाखांवर लोकांना रेशनकार्डवर धान्याचे वाटप केले जाते. त्यातील ८४ टक्के नागरिकांचे आधारकार्ड यापूर्वीच लिंक करण्यात आले आहेत. बाकीचे १६ टक्के नागरिकांचे राहिले आहेत, त्यासाठी ही मोहीम हाती घेतली आहे. नियमित धान्य मिळणाऱ्या अन्नसुरक्षा योजनेतील अंत्योदय व प्राधान्य गटातील लाभार्थ्यांनी धान्याचे मासिक वाटप करतेवेळी ई-पॉस उपकरणाद्वारे आपल्या रेशनकार्डातील ज्या व्यक्तींचे आधार क्रमांक देण्यात आलेले नाहीत त्यांनी रास्तभाव दुकानदार यांच्याकडे आधार कार्ड घेऊन जावे. तिथे जावून बोटाचे ठसे देऊन फिडींग पूर्ण करावे.

हे काम रेशन दुकानातच केले जाणार आहे. त्यासाठी दुसरीकडे कुठेही जाण्याची गरज नाही. त्यामध्ये काही अडचणी येत असतील तर संबंधित तहसील कार्यालय, पुरवठा शाखा यांच्याशी संपर्क साधावा, याबाबत माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी सांगितले आहे.