ग्रामपंचायत निकाल : गावासाठी काहीतरी चांगल करून दाखवा, राज ठाकरे यांची मनसेच्या विजयी उमेदवारांना सूचना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यातील विविध ग्रामपंचायत निवडणुकीत माझे जे महाराष्ट्र सैनिक विजयी झालेत त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन. तुमच्या गावासाठी काहीतरी चांगल करून दाखवण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे. त्या संधीचा पुरेपूर उपयोग करा. बाकी तुम्हा सर्वाना मी लवकरच भेटणार आहे. काळजी घ्या,अशी सूचना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मनसेच्या विजयी उमेदवारांना दिली आहे.

राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका ताकदीनं लढवा, असा आदेश मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिले होते, त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी उमेदवार उभे केले, स्थानिक पॅनेल उभे करून ग्रामपंचयत निवडणुकीत संपूर्ण ताकद पणाला लावली. कार्यकर्त्यांच्या बळावर पहिल्यांदाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ग्रामपंचायत निवडणुकीत चांगले यश मिळवले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचे कौतुक राज ठाकरेंनी केले आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून मनसेने ग्रामीण भागात शिरकाव केल्याचे पाहयला मिळत आहे. ठाणे, बीड, अमरावती, बुलढाणा, अहमदनगर, याठिकाणी मनसेने आपल अस्तित्व दाखवून दिले आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्या तुलनेत मनसेला मिळालेल यश कमी असले तरी नोंद घेण्यासारखे आहे. शहरी भागातील पक्ष म्हणून ओळख असणाऱ्या मनसेने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामीण भागात पाय रोवण्यास सुरूवात केली आहे.