Pune News : पुणे जिल्हयात ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी ?

पोलिसनामा ऑनलाईन टीम – जिल्ह्यातील ७४६ ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यातील ९५ ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. आता १५ जानेवारी रोजी ६५० ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार आहे. दरम्यान, राज्यात महाआघाडी असलेल्या सत्ताधारी पक्षांची जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत मात्र बिघाडी झाली आहे. एवढेच नाही तर काही तालुक्यात मोठ्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप- शिवसेना एकत्र आली आहे. दरम्यान सध्या पारंपारिक विरोधक म्हणून एकमेकांच्या विरोधात उभे टाकले असले तरी निवडणुकीनंतर काही ग्रामपंचायतीत महाआघाडी होऊ शकते.

महाआघाडीत राज्याच्या सत्तेत असलेले मित्र पक्ष जिल्ह्यात एकमेकांचे पारंपारिक विरोधक आहेत. त्या स्थानिक पातळीवर पक्षाचे अस्तित्वात टिकण्यासाठी निवडणुका होणे गरजेचे असते, ही बाब लक्षात घेऊन पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. यामुळेच महाआघाडीला विधानसभेत जमले पण ग्रामपंचायतीत बिघडले आहे .

बहुतेक ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे वर्चस्व

जिल्ह्यातील बहुतेक ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. यंदाच्या निवडणुकीनंतरही राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबरवर राहिली. जिल्ह्यात अनेक ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी स्वतंत्र लढत आहे, काही ठिकाणी आघाडी एकत्र आहे. तर ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाआघाडी होऊ शकते.

– प्रदीप गारटकर, जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

निवडणुकीनंतर महाआघाडी

सध्या राज्यात आम्ही तिन्ही मित्रपक्ष एक सरकार म्हणून एकत्र चांगल्या प्रकारे काम करत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत सध्या काही ठिकाणी महाआघाडीतील पक्ष एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. परंतु निवडणुकीनंतर अनेक ठिकाणी महाआघाडी झालेली दिसेल.

– संजय जगताप, आमदार तथा काँग्रेस जिल्हा अध्यक्ष.

गावकी भावकीचे राजकारण महत्त्वाचे

ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक गावकी भावकीचे राजकारण महत्त्वाचे असते. त्यामुळे थेट पक्षाच्या चिन्हावर या निवडणुका होत नसल्या तरी पक्षाचे अस्तित्वात टिकवण्यासाठी लढती आवश्यक आहे. आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक नेत्यांना निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. निवडणुकीनंतर महाआघाडी होऊ शकते.

– रमेश कोंडे, शिवसेना जिल्हा अध्यक्ष.