लग्न अवघ्या तीन दिवसांवर असताना नवरदेवाची आत्महत्या

कुरूंदा (हिंगोली ) : पोलीसनामा ऑनलाईन- घरामध्ये मुलाचे लग्न असल्याने सर्वांची धावपळ सुरु होती. सर्वांना लग्नाचे आमंत्रण देण्यात आले. घरात उत्साहाचे वातावरण मात्र, लग्न अवघ्या तीन दिवसांवर आले असतानाच नवरदेवाने आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना वसमत तालुक्यातील गिरगाव येथे घडली. मन्मथ माळवटकर (वय-२५) असे आत्महत्या केलेल्या नवरदेवाचे नाव आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

गिरगाव येथील मन्मथ माळवटकर (२५) या युवकाचा २१ फेब्रुवारी रोजी लग्न होणार होते. लग्नासाठी सर्व तयारीही पूर्ण झाली होती. सर्व पाहूण्यांना निमंत्रणही दिले होते. लग्नास अवघे तीन दिवस शिल्लक होते. परंतु मन्मथने सोमवारी रात्री ९ वाजेच्या दरम्यान स्वत:च्या शेतात झाडाला गळाफास घेऊन आत्महत्या केली.

या घटनेमुळे मन्मथच्या घरच्यांना मानसिक धक्का बसला आहे. तर या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मन्मन याने कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे समजू शकले नाही. गजानन माळवटकर यांच्या माहिती वरुन कुरुंदा पोलीस ठाण्यात अकस्मात मुत्यूची नोंद करण्यात आली.