‘ठाकरे सरकार’वर नारायण राणेंची खरमरीत ‘टीका’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे महाविकासआघाडीचे सरकार हे काही महिन्यांचे पाहुणे सरकार आहे, ते दीर्घकाळ चालणार नाही, अशी टीका भाजप खासदार नारायण राणे यांनी केली आहे. राज्यात झालेले बदल आणि त्यामुळे कोकणाच्या विकासावर झालेला परिणाम यावर बोलण्यासाठी त्यांनी सिंधुदुर्गात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते.

महाविकासआघाडीवर टीका करताना नारायण राणे म्हणाले की , ‘महाविकासआघाडी म्हणजे तीन पक्ष वैयक्तिक स्वार्थासाठी एकत्र आले आहेत. सरकारचे खातेवाटपही झाले नाही. अजून मंत्रीही ठरले नाही. त्यामुळे राज्याचा विकास ठप्प झाला आहे. हे सरकार राज्याला अधोगतीकडे नेणारे आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी याला जबाबदार आहेत. सरकारकडून विविध विकासकामांना स्थगिती दिली जात आहे. काम बंद करायची ठेकेदाराला बोलवायचं आणि त्यांच्याकडून पैसे उकळण्याच्या हेतूनं हे सगळं सुरू आहे. सत्ता बदलल्यानंतर कोकणातील विविध विकासकामे ही ठप्प झाली आहेत. त्यामुळे या सरकारचे ‘स्थगिती सरकार’ असे नामकरण करता येईल. जनतेसाठी, शेतकरी कामगार उद्योजक यांच्या हितासाठी एकत्र आले नाहीत तर, फक्त वैयक्तिक स्वार्थापोटी एकत्र आले आहेत. त्यामुळं नक्कीच विकासावर परिणाम होणार आहे. ‘

तसेच 15 ते 18 डिसेंबरला सिंधुदुर्गात आठ तालुक्यांत दौरा करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. या भेटीदरम्यान जनतेला या निवडणुकीमध्ये भाजप सरकार स्थापन का करू शकलं नाही ? तीन पक्षाचं सरकार राज्याला उपयुक्त नाही या संबंधीची माहिती देण्यात येणार आहे. या सरकारने ज्या विकास कामाला स्थगिती दिली आहे. त्या विरोधात आवाज उठवला जाईल असेही ते म्हणाले.

Visit : Policenama.com