कोरोनासंदर्भात गुजरात HC म्हणाले, ‘भारताची तुलना केवळ चीनसोबत होऊ शकते, पण…’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोनाच्या भविष्यात येणाऱ्या लाटेसंदर्भात गुजरात उच्च न्यायलायाने चिंता व्यक्त केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने गुजरात सरकारला भविष्यातील धोका लक्षात घेता आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. तसेच लोक मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छतेच्या नियमांचे पालन करत नसल्याबद्दल न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. कोरोनाची तिसरी अन् चौथी लाट आली तर काय कऱणार? तिसऱ्या लाटेनंतर चौथी लाट येणार कारण राज्यातील लोक मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करणे यासारख्या नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. कोणीच फार गांभीर्याने नियम पाळत नाही. त्यामुळे दर सहा महिन्यांनी नवी लाट येईल, अशा शब्दांमध्ये न्यायालयाने आपली नाराजी व्यक्त केली.

न्या. बेला त्रिवेदी आणि भार्गव डी. करिया यांच्या खंडपीठाने गुजरात सरकारला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य व्यवस्था बळकट करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. गुजरातमधील कोरोना परिस्थितीची न्यायालयाने स्वत: दखल घेत सुमोटो पद्धतीने जनहित याचिका दाखल करुन घेतली. याच याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने ही मत व्यक्त केली आहेत. राज्याच्या ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था दूरदृष्टीने विचार करुन सुदृढ करण्याची गरज असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. सुनावणीदरम्यान अटर्नी जनरल कमल त्रिवेदीनी यासंदर्भात आपल्याला तयारी करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्रिवेदी यांनी भारताची तुलना युरोपीयन देशांशी केली. त्यावेळी न्यायलायाने भारताची तुलना केवळ चीनसोबत होऊ शकते असे म्हटले आहे. चीनने कोरोनासंदर्भात उत्तम काम केल्याच मत न्यायालयाने व्यक्त केले. तुम्हाला केवळ चीन सोबत तुलना करावा लागेल. त्यांनी उत्तम काम केले आहे. पण तेथील नियमांप्रमाणे इथे (भारतात) शिस्त पाळण्यासंदर्भातील कठोर नियम लागू करता येणार नाही. त्यामुळेच आरोग्य व्यवस्था बळकट करण्यावरच आपल्याला भर द्यावा लागेल, असे न्यायालयाने म्हटले आहे.