ज्यांना खायला मिळत नाही, ते सैन्यात भर्ती होतात ; मुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य

बेंगळुरू : वृत्तसंस्था – ज्यांना खायला मिळत नाही, असे लोक सैन्यात भर्ती होतात असे वादग्रस्त वक्तव्य कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी केले आहे. या वक्तव्याचा एक व्हिडीओ ही व्हायरल होत आहे.

भारतीय जनता पक्षाच्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडीओत कुमारस्वामी कन्नड भाषेत असे म्हणत आहेत की, ज्यांना खाण्यासाठी काहीही मिळत नाही, असे लोक सैन्यात भर्ती होतात. या व्हिडीओखाली भाजपने कुमारस्वामी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

कुमारस्वामी यांना माहीत असायला हवं की लोक देशप्रेम म्हणून सैन्यात भर्ती होतात. तुम्ही तुमच्या मुलाला लोकसभा निवडणुकीत लढवण्यापेक्षा सैन्यात का नाही पाठवत ? जेव्हा तुम्ही असे कराल, तेव्हा तुम्हाला सैनिक म्हणजे काय ते कळेल, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

कुमारस्वामी यांनी मात्र अशा प्रकारचे वक्तव्य केले नसल्याचे म्हटलं आहे. या व्हिडीओसोबत छेडछाड झाली असून मला बदनाम करण्यासाठी भाजप या जुन्या युक्त्या वापरत असल्याची टीका कुमारस्वामींनी केली आहे.