पिंपरीत टोळक्याचा 5 जणांवर जीवघेणा हल्ला, 8 जणांवर गुन्हा दाखल

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – जुना वाद मिटविण्यासाठी बोलावून घेत 8 जणांच्या टोळक्याने 5 जणांना चॉपर, फायटरने मारहाण करत तसेच कोयत्याने वार करून जखमी केले. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी देत परिसरात दहशत माजवली. याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक केली आहे. पिंपरीतील नेहरूनगरमध्ये गुरुवारी (दि. 4) सायंकाळी साडेसातच्या सुमारास हा प्रकार घडला.

याप्रकरणी सुरज जैसवाल, रोहित भालेराव, रॉबिन सिंग (तिघे रा. नेहरूनगर, पिंपरी) असे आरोपीचे नाव आहे. त्यांच्यासह किरण जैसवाल, रोहित कसबे (दोन्ही रा. नेहरूनगर, पिंपरी), अरविंद शेलार, आदनान तसेच डायमंड (पूर्ण नाव माहीत नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अक्षय अण्णा रणदिवे (वय 26 रा. खंडे वस्ती, एमआयडीसी भोसरी) यांनी या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

भोसरी एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुने भांडण मिटविण्यासाठी आरोपी सुरजने आकाश खरातला बोलावून घेतले. त्यावेळी आकाश याच्यासोबत फिर्यादी अक्षय रणदिवे, सागर प्रधान, घनशाम यादव, शुशांत जाधव हे देखील गेले होते. पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून आरोपीनी आकाश खरातला कोयते, पिस्तूल सारखे हत्यार, चॉपर, फायटरने मारून गंभीर जखमी केले. तसेच जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच सागर प्रधान, घनशाम यादव, शुशांत जाधव याला कोयता व चॉपरने वार करून जखमी केले. कोयत्याने वार करून फिर्यादी अक्षय रणदिवे यांना जीवे मारण्याची धमकी दिली. दहशत माजवण्याच्या उद्देशाने पिस्तूलसारख्या हत्यारातून फाटफाट आवाज करत, कोयते हवेत फिरवून पळून गेले, असे फिर्यादीत नमूद केले आहे.