Hathras Case : सर्व आरोपी निर्दोष असून त्यांना लगेच मुक्त करा, भाजप नेत्याची मागणी

बाराबंकी : पोलीसनामा ऑनलाइन – हाथरस प्रकरणी पिडीतेबाबत उत्तप्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याने संतापजनक असे वक्तव्य केले आहे. दलित मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष असून, त्यांची तात्काळ सुटका करा. अशा प्रकारच्या मुली या उसाच्या, मका, बाजरीच्या शेतात मृतव्यस्थेत आढळतात. कारण त्यांची मरण्याची जागा तीच असते, असे आक्षेपार्ह वक्तव्य रणजित श्रीवास्तव या भाजप नेत्याने काढले आहे.

बाराबंकी नगरपालिकेचा अध्यक्ष असलेल्या रणजित श्रीवास्तव ने म्हटले की, त्या मुलीने मुलाला बाजरीच्या शेतात बोलविले होते, कारण प्रेमाचा विषय होता. याची माहिती समाज माध्यमात, वृत्तवाहिन्यांत आणि बातम्यांमध्ये उपलब्ध आहे. बलात्कार झालेल्या मुली काही विशिष्ट जागीच मेलेल्या आढळून येतात. या मुलींचे मृतदेह उसाच्या, मका, बाजरीच्या शेतात, नाल्यांमध्ये, झाडाझुडपांत, जंगलात आढळून आले आहेत.

भरपाई कशानेही होणार नाही

हाथरस बलात्कार प्रकरणातील आरोपींची चूक नसून त्यांची तात्काळ सुटका केली पाहिजे. या आरोपींचे निर्दोषत्व सिद्ध होईपर्यंतचा काळ त्यांना तुरुंगातच राहावे लागणार आहे. या तरुणांच्या आयुष्यातील वाया जाणाऱ्या या दिवसांची भरपाई आणि कशानेही होणार नाही, असे श्रीवास्तव यांनी पुढे म्हटले. रणजित श्रीवास्तव यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झाला असून, त्यावरती नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे.

दरम्यान, श्रीवास्तव यांचे विचार पुराणकालीन तसेच अत्यंत बुरसटलेले असून, या सर्व गोष्टींचा नीट विचार झाला पाहिजे, असे टीकास्त्र राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी केले आहे. ते कोणत्याही पक्षाचे राजकीय नेते होण्यास पात्र नाहीत, असे शर्मा यांनी सांगितले. याप्रकरणी श्रीवास्तव यांना राष्ट्रीय महिला आयोगाने नोटीस पाठवली आहे.