Hathras Case : प्रकाश आंबेडकरांनी घेतली पीडित कुटुंबाची भेट, म्हणाले – ‘सीबीआय तपासावर विश्वास नाही’

हाथरस : वृत्त संस्था – संपूर्ण देशाला हादरवणारे हाथरस सामुहिक बलात्कार प्रकरण अजूनही धगधगत आहे. देशभरातील विविध पक्षांचे नेते मृत पीडित तरूणीच्या कुटुंबाचे हाथरसमध्ये जाऊन सांत्वन करून धीर देत आहेत. महाराष्ट्र राज्यातून प्रथमच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी हाथरस येथे जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेतली. हाथरस प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होणे आवश्यक आहे. सीबीआय तपासातून काहीही साध्य होणार नाही, असे ते म्हणाले.

क्रिमिनल प्रोसिजर कोड लावा
अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतल्यानंतर म्हटले की, पीडित कुटुंब अस्वस्थ असून त्यांचे दुःख वाटून घेण्यासाठी आलो आहे. या कुटुंबाचा येथील पोलीस प्रशासनावर विश्वास राहिलेला नाही. न्यायालयीन तपासाचे आदेश आल्यास त्याला क्रिमिनल प्रोसिजर कोड लावायला हवा. यामुळे पुरावे काढणे सोपे होईल, असे मत आंबेडकर यांनी व्यक्त केले.

सीबीआयवर विश्वास नाही
हाथरस प्रकरणाचा तपास केंद्राने सीबीआयकडे दिल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केले आहे. ते म्हणाले, येथील अधिकारीच सीबीआयमध्ये जातात. स्थानिक अधिकार्‍यांशीही त्यांचे संबंध असतात. यामुळे सीबीआयवर विश्वास नाही. सीबीआय किंवा एसआयटी तपास करत असेल तर सर्व कागदपत्र न्यायालयाच्या देखरेखीत असावीत. तपासी अधिकार्‍यांची बदली होऊ नये. मध्यरात्री मृतदेह जाळणारांवर विश्वास कसा ठेवणार? पीडित कुटुंबाला स्थानिक प्रशासनाने धमकावले आहे.

कोट्यवधी आंबेडकरवादी पीडित कुटुंबासोबत
हाथरस प्रकरणात केलेल्या ट्विटमध्ये आंबेडकर यांनी म्हटले की, हाथरसच्या कुटुंबाला भेटण्यासाठी आलो होतो. योगी सरकारने आज सकाळी त्यांना लखनौ येथे नेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप कुणीही नेण्यासाठी आलेले नाही. सरकारने अधिक संवेदनशील झाले पाहिजे. आम्ही आणि देशातील कोट्यवधी आंबेडकरवादी या कुटुंबासोबत आहोत. हाच विश्वास देऊन जात आहे.

न्यायाधीशांकडून तपास करा
हाथरस प्रकरणी सीबीआय तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले की, स्थानिक प्रशासनाने त्यांची विश्वसनीयता पूर्णपणे गमावली आहे. यामुळेच कुटुंबाने सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त अथवा विद्यमान न्यायाधिशांकडून या प्रकरणाचा तपास करण्याची मागणी केली आहे. जी योग्य आहे. कुटुंबाच्यावतीने सर्व पक्षांनी ही मागणी केली पाहिजे.