‘मजा तो तब है, जब’… नागपूर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संजय राऊतांचा टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांचा पाठिंबा घेऊन महाविकास आघाडी स्थापन करून शिवसेनेनं सरकार स्थापन केलं. हे महाविकास आघाडीचे सरकार आणण्यासाठी खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांची भूमिका महत्त्वाची ठरली. मात्र, काँग्रेसने जुळवून घेण्यास नकार दिल्याने आघाडीत बिघाडी होण्याचे संकेत दिसत होते. मात्र यासाठी शरद पवारांनी विशेष प्रयत्न केले आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला. मात्र आता काँग्रेसबरोबर जुळवून घेताना शिवसेनेला कसरत करावी लागत आहे. राहुल गांधींनी त्यांच्या भाषणात सांगितलं की, माझं नाव राहुल सावरकर नाही, तर राहुल गांधी आहे. त्यामुळे माफी मागणार नाही, अशा स्पष्ट शब्दांमध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर, संजय राऊतांनी राहुल गांधींना सूचक इशारा दिला आणि एका शायरीतून ट्विट करत विरोधकांना लक्ष्य केले.

नागपुरात आजपासून नवीन सरकारचे पहिले हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवारी रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. त्यांनी सावरकर यांच्याबद्दल शिवसेनेची भूमिका देखील मांडली. दरम्यान बीजेपीच्या नेत्यांनी शिवसेनेच्या या भूमिकेबाबत आक्षेप घेतला तेव्हा संजय राऊतांनी आपल्या नेहमीच्या शायराना अंदाजातून बीजेपीच्या नेत्यांना टोला लगावला. या वेळेस राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमदार नवाब मलिक हेही उपस्थित होते. तेव्हा नवाब मलिक यांनी देखील राऊत यांना ट्विटरला टॅग करुन शायरी शेअर केली.

दोस्तों में मशहूर हुए तो क्या मज़ा…
मज़ा तो तब है..
जब चर्चा दुश्मनों की महफ़िल में हो…!

असे ट्विट करुन संजय राऊत यांनी भाजपा नेत्यांकडून होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

दरम्यान, भाजपाने रेप इन इंडिया या विधानावरुन राहुल गांधींनी माफी मागावी अशी भूमिका घेतली होती. मात्र राहुल गांधींनी माफी मागण्यास नकार देत सावरकरांचा उल्लेख केला. यावरून शिवसेनेने राहुल गांधींना सूचक इशारा दिला. याबाबत राऊतांनी ट्विट केले की, ‘वीर सावरकर हे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे दैवत आहे. सावरकर नावात राष्ट्राभिमान आणि स्वाभिमान आहे. नेहरू, गांधी यांच्या प्रमाणेच सावरकर यांनी स्वातंत्र्यासाठी जीवनाचा होम केला. अशा प्रत्येक दैवताचा सन्मान करायला हवा. इथे तडजोड नाही. जय हिंद,’ असे त्यांनी आपल्या पहिल्या ट्विट मध्ये सांगितले आणि नंतर दुसऱ्या ट्विट मध्ये ‘आम्ही पंडित नेहरू, महात्मा गांधी यांना मानतो तुम्ही वीर सावरकरांचा अपमान करू नका. सुज्ञांस अधिक सांगणे न लगे,’ अशा शब्दांमध्ये राऊत यांनी राहुल गांधींचं नाव न घेता त्यांना सूचक इशारा दिला आहे. यावरून नवाब मलिक देखील आता शायरीतून काँग्रेस-शिवसेना यांच्यातील शीतयुद्धावर व्यक्त झाले. ते म्हटले,

‘अभी तो इस बाज की असली उड़ान बाकी है
अभी तो इस परिंदे का इम्तिहान बाकी है
अभी अभी मैंने लांघा है समुंदरों को
अभी तो पूरा आसमान बाकी है’

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/